⁠ 
सोमवार, मे 6, 2024

जळगावकरांनो : तुम्हाला यावर्षीही पावसाळ्यात करावा लागणार ‘चिखलाचा’ सामना !

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ जून २०२३ । शहरात विविध योजनांच्या माध्यमातून रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली आहेत. महापालिकेकडून सदर रस्त्यांचे कार्यादेश देखील देण्यात आले आहेत. मात्र मनपाच्या नियोजना अभावी बहुतांश कामांना प्रत्यक्षात सुरुवात झालेली नाही. सदर कामे तातडीने सुरु न झाल्यास त्या कामांना पावसाळ्यामुळे चार महिने ब्रेक लागणार आहे. त्यामुळे कार्यादेश दिलेल्या रस्त्यांची कामे पुर्ण करण्याचे आव्हान मनपा प्रशासनापुढे आहे.

जळगाव शहरातील विविध भागांमधील रस्त्यांची कामे वेगवेगळ्या निधीतून मंजुर झाले आहेत. यात नगरोत्थान योजना, दलित वस्ती सुधार योजना व राज्य शासनाकडून मिळालेल्या निधीतून व मनपा फंडातून कामे मंजुर आहेत. सदर कामांचे कार्यादेश महापालिकेने मक्तेदारांना दिले आहेत. मात्र, मनपाच्या बांधकाम विभागाकडून मक्तेदारांना लाईन आऊट दिली जात नसल्यामुळे मक्तेदारांना काम सुरु करता येत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता कार्यादेश दिलेली कामे कशी पुर्ण होतील, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

राज्यशासनाने मंजुर केलेल्या ४२ कोटी रुपयांपैकी ३८ कोटींच्या कामांचे कार्यादेश झाले आहेत. यात ४९ रस्त्यांची कामे प्रस्तावित होती, या पैकी ३५ रस्त्यांचे दोन स्थर टाकून मक्तेदारांने रस्ते वाहतुकीसाठी खुले केले आहेत. परंतु त्या ३५ रस्त्यांवरील दोन स्थर (कारपेट व सिलकोट) अद्याप मक्तेदाराने टाकलेले नाही. त्यामुळे मक्तेदाराने अर्धवट सोडलेले रस्ते आता पावसाळ्यात टिकतील का याबाबत शंका उपस्थित होत आहे. तसेच उर्वरीत १४ रस्त्यांच्या कामांना मक्तेदाराने अद्याप सुरुवात देखील केलेली नाही. त्यामुळे मक्तेदाराकडून ही कामे कधी सुरु केले जातील, अशा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नगर मधील रेल्वे उड्डाण पुलापासून ते दूध फेडरेशन पर्यंतचा रस्ता ३८ कोटी रुपयांच्या निधीतून डांबरी केला जाणार होता. या कामाला सुरुवात देखील झाली होती. परंतु त्यानंतर आ. सुरेश भोळे यांच्या प्रयत्नाने मंजुर झालेल्या १०० कोटी रुपयांच्या निधीत हा रस्ता काँक्रिट मंजुर झाल्यामुळे अर्धवट डांबरी झालेल्या या रस्त्याचे काम थांबविण्यात आले आहे. आता पावसाळा सुरु असून तो रस्ता डांबरी देखील पुर्ण झाला नसून काँक्रिट होईल की नाही, याबाबत शंका आहे.