जळगाव लाईव्ह न्यूज । १२ ऑक्टोबर २०२५ । या आठवड्यात सोन्यासह चांदीच्या किमतीने मोठी उसळी घेतल्याचं दिसून आले. यात चांदीमध्ये दरवाढीने कहर केला. मागच्या तीन दिवसात चांदी दरात तब्बल १७ हजारापर्यंत वाढ दिसून आली. यामुळे चांदीचा दर पावणे दोन लाखाच्या उंबरवठ्यावर पोहोचला आहे. तर दिवाळीपर्यंत चांदी प्रतिकिलो २ लाखांचा टप्पा गाठेल असा अंदाज आहे.

जळगाव सराफ बाजारात पंधरा दिवसांच्या तेजीनंतर सोन्यात शुक्रवारी घसरण झाली होती.मात्र दुसऱ्याच दिवशी शनिवारी ते पुन्हा १३३९ रुपयांनी वाढून १,२७,५१४ रुपये तोळ्यावर पोहोचले. तर चांदीच्या दरात ३ हजारांची वाढ झाली आणि चांदीने १,७३,०४० चा सार्वकालीन उच्चांक गाठला.

तीन दिवसात चांदी १७ हजारांनी वाढली
गेल्या आठवड्यापासून चांदीच्या भावात मोठी वाढ सुरू आहे. ९ ऑक्टोबर रोजी ११ हजार २०० रुपयांची वाढ झालेल्या चांदीच्या भावात १० रोजी पुन्हा तीन हजार रुपयांची वाढ झाली होती. ११ ऑक्टोबर रोजीदेखील ही भाववाढ कायम राहत चांदी पुन्हा तीन हजार रुपयांनी वधारली. दरम्यान, दिवाळीपर्यंत प्रतिकिलो २ लाखांचा टप्पा गाठेल, असा जाणकारांचा अंदाज आहे.
दरवाढीचे कारण?
विविध कामांसाठी चांदीचा वापर केला जातो. त्या तुलनेत पुरवठा नसल्याने त्यात दरवाढ होत आहे. तसेच चांदीची वितरण शृंखला विस्कळीत झाली आहे. त्यामुळे बाजारपेठेत फिजिकल चांदीचा पुरवठा होत नसल्याचे जळगावातील व्यावसायिकांनी सांगितले








