जळगाव लाईव्ह न्यूज । गेल्या जवळपास महिनाभरापासून जळगाव जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामातील पिके संकटात सापडली आहेत. पावसाअभावी शेतकऱ्यांची चिंता वाढली असून, बळीराजा दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. अशातच हवामान विभागाने जळगाव जिल्ह्यासाठी ४ सप्टेंबर रोजी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला असून, जिल्ह्याला ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज ३ सप्टेंबर रोजी जिल्ह्यात काही प्रमाणात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर ४ सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये पावसाचा जोर वाढू शकतो. त्यामुळे काही भागात जोरदार सरी कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हवामान विभागाने ४ सप्टेंबरसाठी ‘यलो अलर्ट’ दिल्याने शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. खरीप पिकांना सध्या पावसाची आवश्यकता असल्याने हा अंदाज प्रत्यक्षात कितपत खरा ठरतो, याकडे शेतकरी आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे. यंदाच्या पावसाळ्यात अंदाज आणि प्रत्यक्ष पाऊस यामध्ये अनेकदा तफावत दिसून आल्याने यावेळी तरी हवामान विभागाचा अंदाज खरा ठरणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मध्य प्रदेशाकडून येणाऱ्या काही बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र, हा पाऊस केवळ एका दिवसापुरता मर्यादित राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर जिल्ह्यात पुन्हा काही दिवस पावसाची शक्यता कमी असल्याचेही हवामान अंदाजातून स्पष्ट होत आहे.








