⁠ 
शुक्रवार, मे 3, 2024

दिवाळीच्या तोंडावर सर्वसामान्यांना झटका ; खाद्यतेलासह डाळीच्या किमतीत वाढ, वाचा नेमकी किती दरवाढ?

जळगाव लाईव्ह न्यूज । १० ऑक्टोबर २०२२ । देशात सध्या सणांचा काळ सुरू आहे. दसरा सण नुकताच झाला. त्यानंतर आता दिवाळीही काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. मात्र ऐन सणासुदीच्या तोंडावर पुन्हा एकदा सर्वसामान्यांना महागाईचा झटका बसलाय. दिवाळीआधी खाद्यतेलासह डाळींच्या किंमती वाढल्या आहेत.उत्पादन घटण्याच्या भीतीने डाळींची दरवाढ सुरु असल्याचं पाहायला मिळतंय.

मागील काही काळात खाद्यतेलाचे भाव प्रचंड वाढले होते. मात्र त्यानंतर गेल्या काही दिवसात खाद्यतेलाच्या भावात मोठी घसरण दिसून आलीय. गेल्या महिन्यात बाजारात सोयाबीन तेलाच्या एका पाऊचची किंमत 135 ते 135 रुपयापर्यंत इतकी होती. तर सुट्टे तेलाच्या एका किलोचा दर जवळपास 145 ते 148 रुपये तितकी आहे. मात्र काही झालेल्या घसरणीनंतर खाद्यतेलाच्या भावात जवळपास 20 रुपयाहुन अधिकची घसरण दिसून आली.

गेल्या 10 ते 12 दिवसापूर्वी एका पाऊचची किंमत 120 ते 123 रुपयापर्यंत होते. तर खुले एक किलो तेलाचा दर जवळपास 126 ते 130 रुपये इतके होते. परंतु दसऱ्यानंतर खाद्यतेलाच्या भावात वाढ दिसून आली. सध्या बाजारात सोयाबीन तेलाच्या एका पाऊचची किंमत 122 ते 125 रुपयापर्यंत आहे. तर सुट्टे तेलाच्या एका किलोचा दर जवळपास 130 ते 135 रुपयापर्यंत इतका आहे.

डाळींचे दरही वाढले
गेल्या आठ दिवसांमध्ये तूर डाळीच्या किंमतीत चार ते पाच रुपयांची वाढ झाली. सध्या तूर डाळीचा ठोक बाजारातील दर हा 110 रुपये प्रति किलो झाला आहे. तर किरकोळ बाजारात तूर डाळीची किंमत 125 ते 130 रुपये किलो इतकी झाली आहे.

उडीद डाळ 97 ते 100 रुपये किलो इतक्या दराने मिळत होती. मात्र ऐन दिवाळीआधी उडीद डाळीचा दर 105 ते 110 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. वाढलेल्या दरांचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होण्याची शक्यता आहे. यंदा अतिवृष्टीमुळे डाळीच्या पिकांना मोठा फटका बसलाय. डाळीच्या पिकांचं पावसात अतोनात नुकसान झालं. येत्या काळात डाळींचं पिकं घटण्याची शक्यता आहे. त्यामुळे डाळींचे दर वाढण्यास आतापासूनच सुरुवात झाली आहे.

दुसरीकडे गॅस सिलिंडरच्या दरवाढीने डोकेदुखी वाढवली आहे. अशातच ऐन सणासुदीच्या काळात आता डाळीदेखील महागल्याने चिंता व्यक्त केली जातेय.