जळगाव लाईव्ह न्यूज । गेल्या काही महिन्यापासून खाद्यतेलाचं भाव गगनाला भिडले आहे. यामुळे सर्वसामान्यांचे किचन बजेट कोलमडले आहे. आता अशातच खाद्यतेलाच्या दरात किलोमागे पाच ते दहा रुपयांनी वाढ झाली आहे. हॉटेल व रस्त्यावर मिळणारा वडापाव, भजी, डोसे आदी पदार्थही महागण्याची शक्यता आहे. दरम्यान शेंगदाणा तेलाचे दर मात्र सध्या तरी स्थिर असल्याचे समोर येते आहे. देशातील नागरिक साधारणतः सोयाबीन, शेंगदाणे, सूर्यफूल व पामतेलाचे सेवन करतात. या पिकाचे उत्पादन यंदा कमी आहे. त्यामुळे आवक कमी आहे.

त्यात केंद्र व राज्य सरकारने सोयाबीनसह सर्व पिकांच्या हमीभावात वाढ केली. सोयाबीन दरात वाढ झाली आहे. केंद्र सरकारने खाद्यतेलावर २० टक्के आयात शुल्क लावले आहे. त्यामुळे खाद्यतेलाच्या दरात वाढ झाली. दोन वर्षांपूर्वी देशात खाद्यतेलाचे दर वाढले होते. त्यावेळी सरकारने इतर देशातून पामतेल आणि इतर तेल आयात करण्याचे धोरण आखले. त्यामुळे देशांतर्गत खाद्यतेलाच्या किमती कमी झाल्या होत्या. आता केंद्राने सोयाबीनचा दर वाढवला.

असे आहेत भाव?
सोयाबीन – १३५ ते १४०
सूर्यफूल – १५५ ते १६०
शेंगदाणा तेल – १६० ते १९५
मोहरी – १७० ते १७५









