⁠ 
रविवार, मे 5, 2024

जळगावात कापसाला मिळतोय हमीभावापेक्षाही कमी भाव ; शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ डिसेंबर २०२३ । दुष्काळी परिस्थितीत व निसर्गाच्या लहरीपणामुळे यंदा कापसाच्या उत्पादनात घट झाली आहे. त्यातच कापसाचे भाव आता हमीभावापेक्षाही कमी झाल्यामुळे आधीच असलेला भाव परवडत नसलेल्या कापूस उत्पादकांनी जिनींगसह सीसीआयच्या केंद्राकडे पाठ फिरवली आहे. भाव मिळत नसल्याने कापूस उत्पादक शेतकरी हतबल झाले आहेत.

सरकारने कापसाला जाहीर केलेल्या हमी भावापेक्षा कमी भावात व्यापाऱ्यांकडून कापसाची खरेदी केली जात आहे. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष दिसून येत आहे. सध्या कापसाचे दर खासगी बाजारात ६५०० ते ६८०० रुपयांवर आले आहेत. त्यामुळे जिनींगवर शुकशुकाट दिसून येत आहे. तर शेतकऱ्यांनीही आता भाव वाढीपर्यंत कापूस विक्री न करण्याचा निर्णय घेतलेला दिसतोय.

दुष्काळी परिस्थिती मुळे कापसाच्या उत्पादनांत प्रचंड घट आली आहे. त्यातच कापसाला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे उत्पादन खर्चही निघणार नसल्याची स्थिती आहे. मंत्र्यांना एकमेकांवर टीका करण्यास वेळ आहे, मात्र शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायला वेळ नाही.. अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांमध्ये उमटत आहे.

जळगाव जिल्ह्यात यंदा ५ लाख ३० हजार हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली होती. खान्देशात एकूण १५ लाख गाठींची खरेदी जिनींगमध्ये होण्याचा अंदाज होती. मात्र, डिसेंबर संपण्यात असताना देखील खान्देशात आतापर्यंत ४ लाख गाठींची खरेदी झाली आहे. शेतकऱ्यांच्या घरात ६० ते ६५ टक्के माल अजूनही पडून आहे. गेल्यावर्षी उत्पादन चांगले आल्याने शेतकऱ्यांना भाव चांगला मिळण्याची अपेक्षा होती. तथापि, ती फोल ठरली. वर्षभर प्रतीक्षा करुनही भावाचा दोलक प्रतिक्विंटल सात हजारापेक्षा पुढे सरकला नाही.