जळगाव लाईव्ह न्यूज । १ फेब्रुवारी २०२५ । अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देशाचा अर्थसंकल्प २०२५ (Budget 2025) मांडायला सुरुवात केली असून यादरम्यान शेतकऱ्यांसाठी काही महत्वाच्या घोषणा केल्या. ज्यात पंतप्रधान धनधान्य कृषी योजना राबवली जाणार असल्याची घोषणा केली आहे. याशिवाय किसान क्रेडिट कार्ड मर्यादा वाढवण्याचेही त्यांनी सांगितले. यामुळे शेतकऱ्यांना आता कृषी आणि पूरक साहित्य खरेदीसाठी मोठी रक्कम मिळणार आहे.

अर्थसंकल्पाच्या सुरुवातीलाच त्यांनी शेतकऱ्यांचा उल्लेख केला. त्यांनी ‘पीएम धन धान्य कृषी योजने’ची घोषणा केली. ही योजना १०० जिल्ह्यांमध्ये राबवली जाणार आहे. यामुळे देशातील १ कोटी ७ लाख शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
राज्याच्या मदतीने केंद्र सरकार देशात पीएम धन धान्य कृषी योजना राबवणार आहे. गरीब, तरुण, महिला आणि शेतकरी यांच्या उन्नतीवर केंद्रीत हा अर्थसंकल्प असल्याचे निर्मला सीतारमण यांनी सांगितले. शेतीच्या वाढीवर लक्ष केंद्रीत करुन ग्रामीण भागाचा विकास करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती त्यांनी दिली.
तूर, मूग, मसूर अशा कडधान्यांचे ६ वर्षाचे केंद्राचे मिशन असणार आहे. तर कापूस वाढीसाठी ५ वर्षांचे मिशन असणार आहे. यूरीया उत्पादनात आत्मनिर्भरतेचा प्रयत्न केला जाणार आहे. त्याशिवाय खाद्यतेल, डाळ यांच्या उत्पादनात आत्मनिर्भर होण्याचा निर्धार असल्याचेही सीतारमन यांनी सांगितले.
किसान क्रेडिट कार्ड मर्यादा वाढवण्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली. शेतकऱ्यांसाठीची क्रेडिट कार्ड मर्यादा (KCC) आता ३ लाख रुपयांवरून वाढवून पाच लाख रुपये करण्यात आली आहे. किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून ७ कोटी शेतकऱ्यांना अगदी सहजपणे कर्ज मिळू शकणार आहे.
डेअरी, मस्त्यउद्योगांसाठी ५ लाख कर्ज देणार असल्याची घोषणा अर्थमंत्री सीतारमन यांनी केली. याशिवाय फळ, भाजी उत्पादनासाठी विशेष योजना असल्याचेही त्यांनी सांगितले. उत्पादन नवाढीसाठी राज्यांसोबत योजना राबवल्या जातील. कृषी क्षेत्रात एआय वापर करण्याचाही निर्धार असल्याचे त्यांनी सांगितले.