⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

शेतमालाला रास्त भाव देऊ शकत नसाल, किमान रक्षण तरी करा : शेतकरी

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ फेब्रुवारी २०२२ । राज्य शासनाकडून शेतकऱ्यांच्या शेतमालाला रास्त भाव दिला जात नसेल तर किमान शेतमालाचे रक्षण तरी करा अशी संतप्त प्रतिक्रिया सावदा पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. रोझोदा येथील कामसिद्ध महाराज मंदिरावरती परिसरातील शेतकरी शेतमाल व शेत सामग्री चोरांच्या विरुद्ध शेतकरी मोठ्या प्रमाणात एकवटला होता.

यावेळी रोझोदा येथील रमेश महाजन, चिमण धांडे, मिलिंद वायकोळे, रवींद्र चौधरी, विजय महाजन, दीपक धांडे (रोझोदा उप सरपंच) चिनावलं येथील गोपाळ नेमाडे, श्रीकांत सरोदे, दामोदर महाजन, योगेश बोरोले, सावखेडा येथील प्रमोद महाजन, हेमंत महाजन, भागवत महाजन, नामदेव महाजन, हिरामण महाजन, खिरोदा येथील किशोर चौधरी, गोविंदा चौधरी, हर्षल बोरोले, कोचूर येथील कमलाकर पाटील, चिनावल येथील अन्याय ग्रस्त शेतकरी तुषार महाजन, युवराज महाजन, भास्कर सरोदे, ग्रा. प.सदष् सागर भारंबे पोलिस पाटील निलेश नेमाडे, राजू पाटील बन्सी गारसे, राहुल टोके, विनायक महाजन भरत लिधुरे, विजय महाजन, परेश महाजन, चुडामण गारसे, सावदा येथील अतुल नेमाडे, बापू भारंबे, महेश भारंबे, संजय मामा बापू पाटील, कैलास भंगाळे सरोदे, गोपाळ पाटील, किरण नेमाडे खिर्डी यांच्यासह मोठ्या प्रमाणात परिसरातील शेतकरी उपस्तित होते.

दरम्यान चीनावल येथील शेतकऱ्यांनी काही लोकांना शेतमालचोरी करत असल्याचे हटकल्याने उलट शिरजोरी करून शेती मालकालाच मारहाण करण्याचा दुर्दैवी प्रकार दि. 19 रोजी घडला होता. त्याच्या दुसऱ्याच दिवशी पोलिसात तक्रार दाखल केली म्हणून काही लोकांनी शेतकऱ्यांचे केळीच्या बागेतील घड कापून फेकले आहे. यामुळे परिसरात मोठी शेतकऱ्यामध्ये मोठी दहशत पसरली असून शेतकरी भयभीत झाले आहे. आधीच अस्मानी व सुलतानी संकटांना तोंड देणाऱ्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना आता मानव निर्मित संकटांचा ही सामना करावा लागत आहे. शिवजयंतीच्या पावन दिवशीच हा दुर्दैवी प्रकार घडल्याने राज्यात मोगलाई लागून गेली आहे की काय असा खडा सवाल सावदा पंचक्रोशीतील शेतकरी विचारू लागले आहे.

सावदा पोलीसांचे सोयिस्कररित्या दुर्लक्ष

परिसरात गेल्या तीन-चार महिन्यांपासून शेतकऱ्याच्या शेतमालाची व सामग्रीची मोठ्या प्रमाणात नासधूस करुन चोरी होत असून आहे. वेळोवेळी यंत्रणा व व्यवस्थेकडे तक्रारी करून देखील न्याय मिळत नसल्याने परिसरातील शेतकरी हतबल झाला आहे. मागील महिन्यात रणगाव, रायपूर, तासखेडा उधळी या भागातील मोटर पंप मोठ्या प्रमाणात चोरीचा प्रकार घडला होता. चिनावल, कोचुर बुद्रुक, कोचुर खुर्द सावखेडा, रोझोदा, खिरोदा कुंभारखेडा, सावखेडा या शेत शिवारातील शेतकऱ्यांचा पशूधन चोरी करणे, स्टार्टर फोडणे, केबल जाळणे, ठिबक सिंचन व पीव्हीसी पाईपची चोरी करणे अशा अनेक घटना घडल्या असताना यंत्रणा व व्यवस्था सोयीस्कररित्या दुर्लक्ष करत असल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठा रोष निर्माण झाला आहे.

मानवी जीवनाचे व मालमत्तेचे संरक्षण करणे हे पोलिसांचे कर्तव्य असल्याचे मत मागील आठवड्यात अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांनी दि. 11 रोजी असे सावदा येथे वार्षिक तपासणी दरम्यान येथे व्यक्त केले होते. परंतु या वक्तव्याचा विसरच चंद्रकांत गवळी यांना पडलेला दिसतो आहे. त्यामुळे बोलाचा भात आणि बोलाचीच कढी असं तर यंत्रणेचं चालू नाही ना यानिमित्ताने शंका उपस्थित होत आहे. यावेळी श्रीकांत सरोदे, गोपाळ नेमाडे तुषार महाजन, सागर भारबे, विजय महाजन, किशोर चौधरी, भागवत महाजन, गोपाळ पाटील, हर्षल बोरोले, कैलास भंगाळे यांनी त्यांना पिक चोरी संदर्भात आलेले अनुभव व समश्या मांडल्या यावेळी शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी व्हाट्सअप ग्रुप बनवून असे कृत्य करणाऱ्या उपद्रव लोकांची माहिती शेअर करा व पिक संरक्षण संस्था ना बळकटी द्या, पोलिस प्रशासनाने दखल न घेतल्यास जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक यांना सामुहिक निवेदन द्या या नंतर ही कारवाई न झाल्यास थेट विधानसभा ला धडक देवून घेराव घालण्याची तयारी असू द्या व चिनावल, रोझोदा, खिरोदा, सावखेडा, सावदा, कोचूर, कळमोदा, वडगाव, कुंभार खेडा पंचक्रोशीतील शेतकऱ्याची अशा पिक चोरी करणाऱ्या वेळ प्रसंगी शेतकऱ्यांना मारहाण करणाऱ्या लोकांवर अंकुश लावण्यासाठी समन्वय समिती स्थापना व या समीतीने वरिष्ठ स्थरापर्यंत दाद मागून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करण्याचे यावेळी ठरवण्यात आले. व किमान या पुढे तरी पोलिस प्रशासनाने पिक चोरी संदर्भात तक्रार घेऊन येणाऱ्याला प्राधान्य देवून दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी या बैठकीत एकमुखी ठरली.