जळगाव लाईव्ह न्यूज । ३ जून २०२५ । चाळीसगावमधून एक हादरवून सोडणारी घटना समोर आलीय. ज्यात चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा दोरीच्या सहाय्याने गळा आवळून खून करत पतीनेही आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. ही धक्कादायक घटना चाळीसगाव तालुक्यातील हातगाव भिल्ल वस्ती येथे घडली असून विजय सुकदेव चव्हाणके (४५) व वर्षा विजय चव्हाणके (४०) अशी मृत पती- पत्नीची नावे आहेत याप्रकरणी मृत पती विरोधात खुनाचा गुन्हा झाला दाखल झाला आहे.

विजय चव्हाणके हा मुले तसेच आईसह हातगाव शिवारात शेतात राहत होता. त्याचे गेल्या काही दिवसांपासून पत्नीशी वाद होत होता. २ रोजी सकाळी ११:२५ वाजेच्या सुमारास विजय याने मोठा भाऊ अशोक चव्हाणके यांना फोन करून आपण पत्नी वर्षाला संपविले असून, स्वत: सुद्धा बरेवाईट करणार असल्याचे सांगितले.
अशोक चव्हाणके यांनी कुटुंबासह भाऊ विजय व त्याची पत्नी वर्षा यांच्या शोधासाठी शेतात धाव घेतली. त्यावेळी शेतातील आंब्याच्या झाडाला विजय हा गळफास घेतलेल्या अवस्थेत तर वर्षा ही शेतातील गुरांच्या चाऱ्यामध्ये मृतावस्थेत आढळून आली. तिच्या गळ्याभोवती सुती दोरी गुंडाळलेली होती. लहान भाऊ विजय चव्हाणके याने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा खून केला व स्वतः आत्महत्या केली, अशी फिर्याद अशोक चव्हाणके यांनी दिली. त्यावरुन विजयच्या विरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.