⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

वसतिगृहातील समस्यांचे जानेवारीपर्यंत होणार निराकरण!

Jalgaon News-जळगाव लाईव्ह न्यूज । २३ सप्टेंबर २०२२ । जळगावातील आदिवासी मुलांचे शासकीय इमारतीच्या वसतिगृहाचे उद्घाटन आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावीत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांतर्फे प्रवेशा संदर्भात व वस्तीगृहातील समस्याबाबत निवेदन देण्यात आले. दरम्यान, मंत्री गावित यांनी सदर समस्यांबाबत जानेवारीपर्यंत निराकरण होणार असल्याचे आश्वासन दिले.

शैक्षणिक वर्ष २०२१-२२ महाविद्यालये सुरू होऊन दोन ते तीन महिने अधिक झाले आहेत. तसेच जळगाव शहरातील वेगवेगळ्या महाविद्यालयात प्रामुख्याने आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जाणारा नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा, धडगाव, तळोदा, नवापूर व शहादा या तालुक्यातील त्याचप्रमाणे शिरपूर, चोपडा, यावल, रावेर, सुरगाणा, कळवण व इगतपुरी या तालुक्यातील अती दुर्गम भागातील विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून हे विद्यार्थी स्व:खर्चाने राहण्याची सोय करू शकत नाहीय. परिणामी या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून शासकीय आदिवासी मुला-मुलींचे वस्तीगृह विद्यापीठ परिसर जळगाव येथील प्रवेश यादी तात्काळ लावण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

तसेच वस्तीगृहात (परिसरात) ग्रंथालयाची स्वतंत्र इमारत बांधण्यात यावी व त्यात विविध शैक्षणिक क्षेत्रातील चालू वर्षाची व राज्यसेवा लोकसेवा सरळ सेवा पुस्तके उपलब्ध करून द्यावी, वस्तीगृहातील विद्यार्थ्यांची प्रवेश संख्या ५०० (कोटा) वाढवण्यात यावे, वस्तीगृहामध्ये स्वतंत्र संगणक कक्ष व २०११ व नवीन सुधारीत जीआर नुसार दहा विद्यार्थ्यांमागे एक संगणक त्याच प्रमाणे विद्यार्थी संख्या नुसार संगणक उपलब्ध करून द्यावे, वस्तीगृहात ( वायफाय ) इंटरनेटची सुविधा उपलब्ध करून द्यावी, डीबीटी वेळेवर उपलब्ध व्हावी किंवा मिळावी, जिमासिक डीबीटी १०८०० ऐवजी १५००० वाढवून मिळावी, पंडित दीनदयाल योजनेच्या लाभार्थीना शैक्षणिक वर्ष २०२१-२२ संपूर्ण डीबीटी मिळावी किंवा देण्यात यावी,

प्रकल्पांतर्गत स्पर्धा परीक्षेचे क्लासेस परत सुरू करण्यात यावे, व्यावसायिक शिक्षण घेण्यार्या विद्याथ्र्यांचे वस्तीगृहात प्रवेश संख्या (कोटा) वाढविण्यात यावे, वस्तीगृहामध्ये स्वतंत्र व्यायाम शाळा व व्यायामाचे संपूर्ण साहित्य उपलब्ध व्हावे, शैक्षणिक वर्ष २०२१-२२ या वर्षांमध्ये वसतिगृहात प्रवेशासाठी केलेल्या अर्जांचे अर्जदारांना प्रवेश देण्यात यावे, पीएचडी धारकांना टीआरटीआय कडून फिलॉसॉफी देण्यात यावी, M.Ed या वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वस्तीगृहात प्रवेश देण्यात यावे, २०११ व नवीन सुधारीत जीआर नुसार वस्तीगृहाचे खेळ साहित्य निधी १०००० ऐवजी १५००० रूपये वाढवुन मिळावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

या प्रसंगी आयुक्त प्रकल्प हिरालाल सोनवणे नाशिक, आयुक्त प्रकल्प अनुप कुमार यादव मुंबई, प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे, खा. उन्मेष पाटील, खा रक्षा खडसे, आ. शिरीष चौधरी, आ.लताताई सोनवणे, विद्यापीठाचे कुलगुरू विजय माहेश्वरी व वसतिगृहाच्या कर्मचाऱ्यांसह विद्यार्थी उपस्थित होते.