जळगाव लाईव्ह न्यूज । १३ फेब्रुवारी २०२५ । महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला (Congress) मोठा धक्का बसल्यानंतर, राज्यातील काँग्रेस संघटनेत मोठे बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नाना पटोले यांनी विधानसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारून प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर, काँग्रेस हायकमांडने नवीन प्रदेशाध्यक्षाची निवड करण्यासाठी धक्कातंत्राचा वापर करण्याची चर्चा सुरू झाली आहे.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी नाना पटोले यांचा राजीनामा स्वीकारल्यानंतर, नवीन प्रदेशाध्यक्षपदासाठी अनेक नावे चर्चेत होती. पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, विजय वड्डेटीवार, विश्वजित कदम, सतेज पाटील, अमित देशमुख अशी नावे आघाडीवर होती, मात्र काहींनी प्रदेशाध्यक्षपदासाठी नकार दिला. आता हर्षवर्धन सपकाळ यांची निवड होण्याची शक्यता आहे, असे सूत्रे सांगतात.
हर्षवर्धन सपकाळ हे बुलढाणा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. ते सध्या काँग्रेसच्या राजीव गांधी पंचायत राज संघटनचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्या विचारधारेवर आधारित ग्रामस्वराज्य निर्मितीत त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे. सपकाळ यांना सर्वोदय विचारांवर आधारित राष्ट्रनिर्माण युवक शिबिरांचे आयोजन, ग्रामस्वच्छता अभियान आणि आदर्श ग्राम चळवळीतील सक्रिय सहभाग असा व्यापक अनुभव आहे. 2014 ते 2019 या काळात त्यांनी ‘जलवर्धन’ हा जलसंधारण व जलव्यवस्थापन प्रकल्प यशस्वीपणे राबवून त्याची उपयुक्तता सिद्ध केली.
महाराष्ट्र सारख्या महत्त्वाच्या राज्यात पुन्हा एकदा आपली पकड मिळवण्यासाठी काँग्रेसने कंबर कसली आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेस संघटनेत मोठे बदल करण्यात येत आहेत. सपकाळ यांना संघटना बळकटीसाठी योग्य पर्याय मानले जात आहे, कारण त्यांनी गुजरात, मध्य प्रदेशमध्ये देखील काम केले आहे.