⁠ 
शुक्रवार, मे 3, 2024

बीएचआर घोटाळ्यामुळे कष्टकऱ्यांचे पैसे बुडाले हे सत्य : गुलाबराव पाटील

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ जून २०२१ । बीएचआर मल्टिस्टेट पतसंस्थेमध्ये जनतेचे कष्टाचे पैसे बुडाले हे सत्य काेणीही नाकारू शकत नाही. तपास यंत्रणा त्यांच्या अधिकारात चाैकशी करीत आहे. या प्रकरणास राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करू नये, असे मत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पत्रकारांशी बाेलताना व्यक्त केले.

बीएचआर पतसंस्थेशी संबंधित प्रकरणात अनेक बड्या कर्जदारांकडे छापे टाकून त्यांना आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. या अटकेनंतर माजी मंत्री गिरीश महाजन यांनी ही कारवाई राजकीय असल्याचे म्हटले आहे. याबाबत विचारले असता पालकमंत्री म्हणाले की, या संस्थेतकष्टकऱ्यांचा कष्टाचे पैसे बुडाले हे सत्य आहे. हे सत्य माजी मंत्री महाजन नाकारू शकत नाही. जे दोषी नसतील ते निर्दोष सुटतील परंतु ज्यांनी चूक केली असेल त्यांना भरावंच लागेल हे सांगायला देखील ते विसरले नाही.

‘ज्यावेळी बाबरी मशिदीचा ढाचा ढासळला, तेव्हा भाजपच्या ७२ नेत्यांनी बाबरीचा ढाचा आम्ही पाडला, हे तेव्हा का कबूल केले नाही?, याचे उत्तर गिरीश महाजनांनी आधी द्यावे, मग हिंदुत्त्व सिद्ध करावे’, अशा शब्दांत शिवसेना नेते मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी महाजनांना जोरदार टोला लगावला आहे.

मंत्री ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, भाजपाच्या ७२ नेत्यांनी तेव्हा बाबरीचा ढाचा आम्ही पाडला, हे का कबूल केले नाही. तेव्हा एकच बाप होता बाळासाहेब ठाकरे; ज्यांनी सांगितले पाय नाही हात आहे, हात नाही पाय आहे, याचे उत्तर गिरीश महाजन यांनी द्यावे, असे आवाहन ना. गुलाबराव पाटील यांनी केले.