⁠ 
गुरूवार, मार्च 28, 2024

राज्यपालांच्या डोक्यात काय तेच कळेना : ना.गुलाबराव पाटील

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ मे २०२१ । राज्यपाल कोट्यातून आमदारकीसाठी ज्या बारा लोकांची नियुक्ती रखडली आहे, त्यांना लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे. या नियुक्तीचा अधिकार राज्यपालांना आहे, पण त्यांच्या डोक्यात काय आहे, तेच आम्हाला माहिती नाही, अशा शब्दांत राज्याचे सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी राज्यपालांवर टीकास्त्र सोडले आहे. राज्यपालांचे सचिव आता न्यायालयाला याबाबत काय उत्तर देतात, त्याची उत्सुकता मलाही लागली असल्याचेही पाटील म्हणाले.

ना. पाटील हे आज शनिवारी दुपारी जळगावात होते. अजिंठा शासकीय विश्रामगृहात कार्यकर्त्यांच्या भेटी-गाठी घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी ना.पाटील म्हणाले की, राज्यपाल नियुक्त आमदारांच्या रखडलेल्या नियुक्तीबाबत न्यायालयाने राज्यपालांच्या मुख्य सचिवांना विचारणा केली आहे. त्याचे उत्तर दोन आठवड्यात मागितले आहे. आता ते न्यायालयाला काय उत्तर देतात, याची तुमच्याप्रमाणे मलाही उत्सुकता आहे.

राज्यपाल नियुक्त आमदार करणे ही काही आजची गोष्ट नाही. ही बाब परंपरागत सुरू आहे. आमदार मग तो विधानसभेचा असो किंवा विधानपरिषदेचा, प्रत्येकाच्या डोक्यात विकासाच्या बाबतीतच नव्हे तर राज्याला सूचना देण्याच्या बाबतीत वेगवेगळ्या प्रकारची कल्पना असते. त्यामुळे आमदारांच्या नियुक्तीला महत्त्व दिले पाहिजे. आपला देश विविध भाषा आणि प्रदेशात विभागला आहे. म्हणून कोणत्याही विधानसभा क्षेत्रात लोकप्रतिनिधींच्या जागा रिक्त राहणे लोकशाहीसाठी योग्य नाही, असेही गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

दरम्यान, यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कोकण दौऱ्यावरून होत टीकेला उत्तर देताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांचा चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले, कोरोना काळ किंवा नैसर्गिक आपत्तीवेळी विरोधकांनी कोणत्याही प्रकारची टीका-टिप्पणी करायला नको. अशा कठीण काळात राजकारण बाजूला ठेऊन सूचना केल्या पाहिजेत, मार्गदर्शन झाले पाहिजे. अनुभवाचे बोल सांगायला हवे. मुख्यमंत्री ठाकरेंनी कोकणात जाऊन मदतीची केलेली घोषणा तपासली तर मुख्यमंत्र्यांनी काय केले हे फडणवीसांच्या लक्षात येईल. मुख्यमंत्रीच काय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पण व्हीसीवरून काम करत आहेत. ते पण पहिल्यांदा गुजरातला गेले. मुख्यमंत्री जरी घरात असले तरी यंत्रणा बंद आहे का? आम्ही रस्त्यावर नाहीत का? मंत्री रस्त्यावर काम करत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानेच काम चालत आहे, असेही गुलाबराव पाटील म्हणाले.