⁠ 
गुरूवार, मे 2, 2024

शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडत गिरीश महाजन विदेशात गेले आहेत !

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ मे २०२३ । एकमेकांवर नेहमी टिका करणारे आ. एकनाथ खडसे आणी मंत्री गिरिश महाजन यांच्यात पुन्हा वाकयुद्ध जनतेला पहायला मिळणार आहे. कारण आ. एकनाथ खडसे यांनी मंत्री गिरिश महाजन यांच्यावर टिका केली आहे. सध्या शेतकरी अनेक बाजूंनी अडचणीत आला असतांना त्यांना वार्‍यावर सोडून गिरीश महाजन हे विदेशात गेल्याची घणाघाती टिका आज आमदार एकनाथराव खडसे यांनी केली आहे.

शेतकर्‍यांच्या विविध पिकाला हमीभाव मागणीसाठी जामनेर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी तर्फे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी युवक प्रदेश अध्यक्ष महबूब शेख जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील विजय देसले राष्ट्रवादी नेते संजय दादा गरुड राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष विलास राजपूत युवक अध्यक्ष डॉक्टर प्रशांत पाटील यांच्यासह राष्ट्रवादी कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

खडसे पुढे म्हणाले की, आज शेतकर्‍यांच्या कांद्याला भाव नाही कपाशीला भाव नाही ज्वारीला भाव नाही त्यामुळे शेतकरी हवालदील झाला असून उद्या नवीन कपाशी पिकाची लागवड होणार आहे. मात्र कपाशीला भाव नसल्यामुळे आजही मागच्या वर्षाची कपाशी घरात पडून आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला असून या शेतकर्‍यांच्या समस्या कडे लक्ष द्यायला सरकारकडे वेळ नाही. येणार्‍या अधिवेशनामध्ये मी शेतकर्‍यांच्या प्रश्नाबाबत विधानसभेत आवाज उठवणार आहे अशी प्रतिक्रियाजामनेर येथील राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी तर्फे करण्यात आलेल्या एकदिवसीय लाक्षणिक उपोषण प्रसंगी बोलताना एकनाथराव खडसे यांनी दिली आहे.