⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

राज्यसभा उमेदवारीवरुन गिरीश महाजनांचे संजय राऊतांना प्रत्त्युत्तर, म्हणाले..

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ मे २०२२ । राज्यात सध्या राज्यसभा निवडणुकीच्या (Rajya Sabha Election) मुद्द्यावरुन जोरदार राजकारण पाहायला मिळत आहे. सहाव्या जागेसाठी शिवसेनेनं संजय पवार (Sanjay Pawar) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर भाजपने माजी कृषिमंत्री अनिल बोंडे यांना राज्यसभेची उमेदवारी दिली. अनिल बोंडेंना मिळालेल्या उमेदवारीवरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आक्षेप घेतला होता. आता त्यावरून भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिलंय.

काय म्हणाले गिरीश महाजन?
मागच्या काळात शिवसेनेनं निष्ठावंतांना उमेदवारी का दिली नाही? त्यावेळी त्यांनी राजकुमार धूत, ब्रिटिश नंदी, प्रियंका चतुर्वेदी यांना उमेदवारी देण्यात आले. तसंच महाजन यांनी शिवसेनेला स्थानिक आणि निष्ठावानांची आठवण करुन दिली. दरम्यान, राज्यसभा निवडणुकीत भाजपचे तीनही उमेदवार निवडून येतील. कारण आमच्याकडे बहुमत आहे. त्यामुळे भाजपच्या उमेदवारांचा विजय निश्चित होईल, असा दावाही गिरीश महाजन यांनी केलाय.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका
महाजन यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही जोरदार टीका केलीय. पंतप्रधान नरेंद्र मोदी जगभर फिरत आहेत. तुम्ही मात्र माझं कुटुंब आणि माझी जबाबदारी यातच गुरफटून पडले, असा टोला महाजनांनी उद्धव ठाकरेंना लगावलाय.

दरम्यान, संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केलीय. कोल्हापुरातून भाजपने एका दूध आणि साखर सम्राटाला उमेदवारी दिली. पण हा त्यांचा प्रश्न आहे. मला आश्चर्य वाटतं दोन्ही उमेदवार राज्यसभेचे भाजपचे नाहीत. बाहेरचे आहेत. जे निष्ठावंत आहेत. जे संघपरिवाराशी संबंधित आहेत. त्यांना डावलल्याचं वाचलं. जे इतर पक्षातून आलेत ते फक्त शिवसेनेवर किंवा महाविकास आघाडीवर चिखलफेक करत असतात अशा लोकांना उमेदवारी दिली आहे. भाजपने उमेदवारी दिलेली विदर्भातील एक व्यक्ती शिवसेनेत होती. शिवसेनेत काम केलं. दुसरा उमेदवार हा शिवसेना, कधी राष्ट्रवादी असा प्रवास करून आला आहे.त्यामुळे त्यांच्या पक्षातच नाराजी आहे. हा जुना भाजप राहिला नाही. अशाच लोकांनी एकत्र येऊन हा पक्ष ताब्यात घेतला आहे. पण आम्ही निष्ठावंतांना उमेदवारी दिली आहे, असं राऊत म्हणाले.