बातम्यामहाराष्ट्रराजकारण

महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा अखेर फॉर्म्युला ठरला; अर्थखातं आणि गृहखातं कोणाकडे?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ डिसेंबर २०२४ । महायुतीचा शपथविधी पार पडून आठवडा उलटला तरी अद्यापही उर्वरित मंत्रिमंडळाचा शपथविधी आणि खातवाटप जाहीर झालेलं नाही. 16 डिसेंबर पासून विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरु होणार असून त्यापूर्वी उद्या (14 डिसेंबर) फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती समोर आलीय. फडणवीस सरकारच्या या मंत्रिमंडळात कुणा-कुणाचा समावेश असणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

यातच महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजपकडे 21 खाती, शिवसेना शिंदे गटाकडे 13, तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे 9 मंत्रिपदं असणार आहेत. यात पहिल्या टप्प्यात 35 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. भाजप 17, तर शिवसेना 10, आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 7 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.

अर्थखातं आणि गृहखात्याबाबत काय निर्णय?
महत्त्वाचं म्हणजे अर्थखातं आणि गृहखातं भाजप स्वत: कडे ठेवणार आहे. मागच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री असणाऱ्या एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री व्हावं लागल्याने शिवसेनेने वारंवार गृहमंत्रिपद आपल्याकडे असावं, असा दावा केला. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे खातं देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर अजित पवारांना अर्थखातं सांभाळण्याचा दांडगा अनुभव आहे. शिंदे सरकारमध्येदेखील अजित पवार अर्थमंत्री होते. मात्र आता अर्थखातं फडणवीसांकडे राहणार असल्याची माहिती आहे.

एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास आणि महसूल खातं असणार आहे. तर अजित पवार यांच्याकडे गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम ही महत्त्वाची खाती असणार आहेत. त्यामुळे आता फडणवीसांच्या मंत्रिमंडळात कुणाचा समावेश असणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button