⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

मोठी बातमी : दीपनगर वीज प्रकल्पाला आग; झाले मोठे नुकसान

जळगाव लाईव्ह न्यूज | १९ मे २०२३ | दीपनगर येथील औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील ५०० मेगावॉट प्रकल्पात गुरुवारी (ता. १८) सकाळी साडेसहाच्या सुमारास आग लागली. या आगीत तीन मीटर जळून खाक झाले. दुसरीकडे निर्माणाधीन असलेल्या ६६० मेगावॉटच्या नवीन प्रकल्पामध्येही त्याचवेळी आग लागल्याने प्रचंड धावपळ उडाली. अग्निशमक दलाने तब्बल तीन तासानंतर ही आग आटोक्यात आणली. दरम्यान, या घटनांमध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नसून प्रकल्पाचे मात्र मोठे नुकसान झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी ५०० मेगावॉट प्रकल्पाचे मुख्य अभियंता मोहन आव्हाड व त्यांच्या सहकार्‍यांनी जाऊन पाहणी केली. आग विझविण्यासाठी अधिकार्‍यांची दोन ते तीन तास धावपळ सुरू होती. मात्र ६६० मेगावॉट प्रकल्पामध्ये किती नुकसान झाले, याची माहिती अद्यापावतो समोर आलेली नाही. प्राप्त माहितीनुसार, दरम्यान, अग्निशमक दलाने तीन तासानंतर आग आटोक्यात आणली.

भुसावळ आष्णिक विद्युत केंद्रांच्या युनिक क्रमांक तीनची प्रकल्प मर्यादा संपलेली असूनही या केंद्रातून वीजनिर्मिती होत असल्याची तक्रार राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथराव खडसे यांनी केली होती. यासह दीपनगर औष्णिक विद्युत केंद्रातील राखेच्या पाईपलाईनव्दारे राख मिश्रित पाणी सोडून तेथील सिंचन योजना उद् ध्वस्त होत असल्याची तक्रारही त्यांनी केली होती. या प्रकरणाची उच्चस्तरिय चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत केली आहे.

दीपनगरमध्ये १९६८ पासून वीज निर्मिती
दीपनगरमध्ये जुलै १९६८ मध्ये ६५ मेगावॉट स्थापित क्षमतेच्या संच क्रमांक १ ची मुहूर्तमेढ रोवली गेली. ऑगस्ट १९७९ मध्ये २१० मेगावॉट स्थापित क्षमतेचा संच क्र. २, तर सप्टेंबर १९८२ मध्ये २१० मेगावॉटचा संच क्र. ३ कार्यान्वित झाला. नोव्हेंबर २०१२ व जानेवारी २०१४ मध्ये ५०० मेगावॉटचे दोन संच कार्यान्वित झाल्याने दीपनगरची स्थापित क्षमता एक हजार ४२० मेगावॉट झाली होती. मागील काळात ६५ मेगावॉटचा संच क्र. १ व २१० मेगावॉट स्थापित क्षमतेचा संच क्र. २ व ३ हे कायमस्वरूपी बंद करण्यात आलेत. आता प्रत्येकी ५०० मेगावॉटचे संच क्र. ४ व ५ यामधून वीजनिर्मिती करण्यात येत आहे. सध्या केंद्राची स्थापित क्षमता एक हजार मेगावॅट आहे.