⁠ 
शुक्रवार, मे 3, 2024

कापसाला भाव नसल्याने शेतकऱ्यांची घुसमट सुरू

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ डिसेंबर २०२३ । गेल्या काही वर्षांचा आढावा घेतल्यास वर्षांअखेर व नाताळच्या दरम्यान कापसाचे दर काहीसे कमी झाल्याचे दिसून येतात. कापसात घसरण झाल्याने कापूस उत्पादक कोंडीत सापडले आहेत.

कापसाचे सर्वसाधारण दर दोन वर्षांपूर्वी १४ हजार ३०० रुपयांपर्यंत पोचले होते. मागीलवर्षी ९ हजार २०० ते ९ हजार ५०० रुपये क्विंटलपर्यंत भाव जाऊन हंगाम अखेर ७ हजार ५०० रुपयांवर आले होते. दहा हजारांच्या आशेवर असलेल्या अनेक शेतकऱ्यांचा कापूस अजूनही गावागणिक दोन, तीन शेतकऱ्यांकडे पडून आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर दरातील घडामोडी, शिल्लक साठा आणि यावर्षी उत्पादीत होणारा कापूस या सर्वांचा परिणाम पसाच्या बाजारभावातील दराशी येत असतो. यावर्षी बोंडअळीमुळे कपाशीचे पीक शेतकऱ्यांना परवडणारे नसल्याचे स्पष्ट झाले आहे. सध्या गहू, मका, भुईमुगाची पेरणी व उन्हाळी कांदा लागवड सुरू असल्याने शेतकऱ्यांना पैशांची गरज आहे. त्यामुळे बहुसंख्य शेतकरी कापूस विक्री करण्याच्या मनःस्थितीत असले तरी भाव नसल्याने शेतकऱ्यांची सध्या घुसमट सुरू आहे.