⁠ 
रविवार, मे 5, 2024

शेतकऱ्यांनो तुम्हालाही ‘हा’ मेसेस आला तर सावध राहा! अन्यथा होऊ शकते फसवणूक

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ जानेवारी २०२४ । तुम्हीही शेतकरी असाल तर तुमच्यासाठी ही बातमी आहे. कारण प्रधानमंत्री कुसुम योजनेंतर्गत (Pradhan Mantri Kusum Yojana)सौरपंपासाठी अर्ज करणाऱ्या अनेक शेतकऱ्यांच्या भ्रमणध्वनीवर फसवे संदेश पाठवले जात आहेत. यातून शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची शक्यता असून, या संदेशापासून सावध राहावे, असे आवाहन महाऊर्जाचे अपर महासंचालकांनी केले आहे, अशी माहिती जिल्हा व्यवस्थापक शिवाजी बोडके यांनी दिली आहे.

शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे शक्य व्हावे यासाठी राज्यातील शेतकऱ्यांना कृषी वापरासाठी पारेषणविरहित सौर कृषिपंप अनुदान तत्त्वावर उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या योजनेंतर्गत ३, ५ व ७.५ एचपी क्षमतेचे सौर कृषिपंप ९० ते ९५ टक्के अनुदानावर उपलब्ध आहेत. सौर कृषिपंपांसाठी पात्र लाभार्थीना पंपाच्या क्षमतेनुसार खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यास १० टक्के आणि अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यास ५ टक्के लाभार्थी हिस्सा भरण्यासाठीचा मेसेज पाठविला जातो. राज्य शासनाने या योजनेसाठी महाऊर्जास १,०४,८२३ सौर कृषिपंपांसाठी मान्यता दिली.

सदर मान्यतेनुसार महाऊर्जेमार्फत लोकसंख्येनुसार जिल्हानिहाय उद्दिष्ट निश्चित करण्यात आले. महाऊर्जामार्फत सद्यःस्थितीत सुमारे ७५,७७८ सौर कृषिपंप आस्थापित करण्यात आले आहेत. महाऊर्जाने योजना राबविण्यासाठी https://kusum.mahaurja.com/ solar/beneficiary/register/Kus um-Yojana-Component-B है स्वतंत्र ऑनलाइन पोर्टल विकसित केले आहे. या पोर्टलद्वारेच ही योजना राबविली जात असल्याने शेतकऱ्यांनी कुठल्याही संदेशाला बळी पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.