जळगाव लाईव्ह न्यूज । २९ मार्च २०२५ । एकीकडे जीवनावश्यक वस्तू महाग होत असताना दुसरीकडे वाढत्या वीजदरांमुळे त्रस्त असलेल्या नागरिकांना आता मोठा दिलासा देणारी बातमी समोर आलीय. महावितरण कंपनीची वीज दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. महावितरण कंपनीने महाराष्ट्र राज्य वीज नियमक आयोगाकडे वीज दर कपातीसाठी पाठविलेल्या प्रस्तावावर सुनावण्या झाल्यानंतर आता महाराष्ट्र राज्य वीज नियमक आयोगाने वीज दर निश्चितीचे आदेश जारी केले.

यामुळे वीज दर १० टक्क्यांनी स्वस्त होणार आहे. महत्वाचे म्हणजे राज्यात पुढील ५ वर्षे वीज स्वस्त होणार आहे. या निर्णयामुळे राज्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. महाराष्ट्र राज्य वीज नियमक आयोगाने रात्री उशिरा जारी केलेल्या आदेशानुसार २०२५-२६ या वर्षासाठी वीज दरामध्ये सुमारे १० टक्के कपात होणार आहे. नवे वीजदर १ एप्रिलपासून लागू होणार आहेत.
महत्वाचे म्हणजे महायुती सरकारने विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान वीज दर कमी करण्याबाबतच्या घोषणा केल्या होत्या. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नव्या सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर करत असताना येत्या ५ वर्षांत महाराष्ट्रात वीजेचे दर कमी होणार असल्याबाबतची घोषणा केली होती.