⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

राज्यातील वीज मीटर होणार स्मार्ट

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ जुलै २०२२ । राज्याचा झपाट्याने होणारा औद्योगिक विकास आणि त्यामुळे होणारे शहरीकरण लक्षात घेता भविष्यात विजेच्या मागणीचे योग्य नियोजन व्हावे‚ ग्राहकांना अपघातविरहीत आणि दर्जेदार वीजपुरवठा मिळावा यासाठी महावितरणद्वारे वीज यंत्रणेच्या बळकटीकरणासाठी 39,602 कोटींची योजना राबविण्यात येणार  आहे.  यात ग्राहकांसाठी स्मार्ट प्रीपेड मीटरिंग सोबतच  वाणिज्यिक, औद्योगिक व शासकीय ग्राहकांना स्मार्ट प्रीपेड मीटर बसविणे, वितरण रोहित्रे (Distribution Transformers) आणि वाहिन्यांना (Feeders) संवाद-योग्य (Communicable) आणि स्वयंचलीत मीटरींग सुविधा (Automatic Metering Infrastructure) प्रणालीसाठी सुसंगत मीटरिंग करण्यात येणार आहे. याशिवाय मीटर नसलेल्या वाहिन्यांचे मीटरिंग आणि विद्यमान मीटर ऑनलाइन करणे आदी कामांसाठी 11,105 कोटींची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिली आहे.

या योजने अंतर्गत 15 टक्क्यांपेक्षा अधिक वाणिज्यिक व तांत्रिक हानी असलेल्या अमृत शहरांच्या विभागातील  37 लाख 95 हजार 466 ग्राहक,  15 टक्क्यांपेक्षा कमी वाणिज्यिक व तांत्रिक हानी असलेल्या अमृत शहराच्या विभागाव्यतिरिक्त इतर शहरी विभागातील 2 लाख 60 हजार 717 ग्राहक तर ग्रामिण भागातील 26 लाख 67 हजार 703 ग्राहक, सर्व व्यावसायिक, औद्योगिक, शासकीय व उच्चदाब असलेले 26 लाख 95 हजार 716 ग्राहक, तसेच या विभागांमधील 25 केव्हीए क्षमतेवरील बिगर शेतीसाठीची 2 लाख 30 हजार 820  वितरण रोहीत्रे आणि 27 हजार 816 वितरण वाहिन्यांवर स्मार्ट मीटर बसविण्याचे नियोजन केले आहे. ही सर्व कामे डिसेंबर 2023 पर्यंत पुर्ण करावयाची आहे. याशिवाय 15 टक्क्यांपेक्षा कमी वाणिज्यिक व तांत्रिक हानी असलेल्या अमृत शहरातील विभागातील 55 लाख 38 हजार 585 वीज ग्राहक, 15 टक्क्यांपेक्षा अधिक वाणिज्यिक व तांत्रिक हानी असलेल्या 25 टक्क्यांपेक्षा कमी वितरण हानी असलेल्या अमृत शहराच्या विभागाव्यतिरिक्त ग्रामिण विभागातील 16 लाख 60 हजार 946 ग्राहक आणि या विभागातील 25 केव्हीए क्षमतेवरील बिगर शेतीसाठीची 1 लाख 76 हजार 687  वितरण रोहीत्रे, अशी एकूण 1 कोटी 66 लाख ग्राहकांना 4  लाख 7 हजार  वितरण रोहीत्रांना व 27 हजार 826 वाहिन्यांना स्मार्ट मीटर बसविणे प्रस्तावित असल्याचे देखील श्री विजय सिंघल यांनी सांगितले आहे.