⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

होय, मला देवेंद्र फड‌णवीसांचा फोन आला होता, एकनाथ खडसे

जळगाव लाईव्ह न्यूज । ०३ जून २०२१ । विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे दोन दिवसापूर्वी वादळामुळे नुकसान झालेल्या मुक्ताईनगर, रावेर तालुक्यातील भागाची पाहणी करण्यासाठी  जिल्ह्यात आले होते. यावेळी त्यांचा मला फोन आला होता. यानंतर मी त्यांना घरून भोजन करून जावे, असे सांगितले. मात्र, त्यांनी पुढे जेवणाची व्यवस्था अाहे, असे सांगितल्याची स्पष्टोक्ती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी दिली.

गेल्या काही दिवसापूर्वी चक्रीवादळामुळे मुक्ताईनगर, रावेर तालुक्यात शेतकऱ्यांचं मोठ नुकसान झालं आहे. या नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी देवेंद्र फडणवीस  मंगळवारी जिल्ह्यात आले होते. जामनेरहून ते थेट मुक्ताईनगरला गेला. खासदार रक्षा खडसेंच्या आग्रहाखातर फडणवीस कोथळीत खडसेंच्या निवासस्थानी चहापानासाठी गेले. माजी मंत्री गिरीश महाजन, आमदार संजय सावकारे आदी त्यांच्यासोबत होते. फडणवीस त्याठिकाणी जवळपास अर्धातास होते. तेथेच त्यांनी चहापान घेतले.

यावेळी माजी मंत्री एकनाथ खडसे हे बाहेरगावी होते. मात्र, दोघांमध्ये संवाद झाल्याची चर्चा होती. याबाबत नेते एकनाथ खडसे यांना विचारणा केली असता, त्यांनी होय मला फडणवीस यांचा फोन आला होता, असे सांगितले.

फोनवरुन नमस्कार झाल्यानंतर खडसे म्हणाले, ‘मी, इकडे मुंबईत आहे.. आपण आलात, आपले स्वागत आहे. मी नसलो तरी जेवल्याशिवाय जाऊ नका..’ या आग्रही विनंतीला फडणवीसांनी ‘आपल्या भागात आलोय. जेवणाचे नियोजन अन्य ठिकाणी आधीच झालेले आहे. पुढच्या वेळी आपल्याकडे नक्की भोजन करेल..’ असे नम्रपणे सांगितले.

खडसे आता भाजपत नाही, ते राष्ट्रवादीचे नेते झाले. फडणवीसांवर नाराजी व्यक्त करत त्यांनी पक्ष सोडला. दोघा नेत्यांमध्ये त्यामुळे शाब्दिक वादही झालेत. मात्र, राजकीय मतभेदापलीकडचे संबंध व त्यातून अनुभवायला आलेल्या या आदरातिथ्याची चर्चा जिल्ह्यात सध्या सुरु आहे.