⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

जिल्हा प्रशासन, नेहरू युवा केंद्रातर्फे जिल्हास्तरीय भाषण स्पर्धा

जळगाव लाईव्ह न्यूज । २० नोव्हेंबर २०२१ । जिल्हा प्रशासन आणि नेहरू युवा केंद्रातर्फे आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास या संकल्पनेनुसार देशभक्ती आणि राष्ट्र निर्माण या विषयावर भाषण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हास्तरावरील स्पर्धेत विजयी होणाऱ्या स्पर्धकांना राज्य आणि देशस्तरावरील स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. जिल्ह्यातील स्पर्धकांनी जास्तीत जास्त प्रमाणात आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन जिल्हा युवा अधिकारी नरेंद्र डागर यांनी केले आहे.

जिल्हा प्रशासन आणि नेहरू युवा केंद्र जळगावतर्फे आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास या संकल्पनेसह देशभक्ती आणि राष्ट्र निर्माण या विषयावर घोषणा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचे चार टप्पे असून तालुकास्तरावरील स्पर्धेत स्पर्धकांची निवड केली जाणार आहे. प्रत्येक तालुक्यातून निवडल्या जाणाऱ्या स्पर्धकांना जिल्हास्तरावर सादरीकरणाची संधी दिली जाणार आहे. तालुकास्तराची निवड लवकरच केली जाणार असून स्पर्धकांनी नेहरू युवा केंद्र जळगावच्या जिल्हा कार्यालयाची संपर्क करावा किंवा www.nyks.nic.in ला भेट द्यावी, असे आवाहन युवा अधिकारी नरेंद्र डागर यांनी केले आहे.

चार टप्प्यात होणार स्पर्धा, लाखोंची बक्षीसे
स्पर्धा चार टप्प्यात होणार असून तालुकास्तरावर केवळ निवड केली जाणार आहे. जिल्हास्तरावरील स्पर्धेत अनुक्रमे पाच, दोन आणि एक हजाराचे बक्षीस दिले जाणार आहे. राज्यस्तरावरील स्पर्धेत २५, १० आणि ५ हजारांचे रोख बक्षीस आहे. राज्यातून निवड केलेल्या स्पर्धकाला देशस्तरावर भाषण देण्याची संधी मिळणार असून त्याठिकाणी २ लाख, १ लाख आणि ५० हजारांचे रोख बक्षीस आहे. तसेच उत्तेजनार्थ स्पर्धकांना १० हजारांचे बक्षीस दिले जाणार आहे.

२६ जानेवारीला होणार अंतिम फेरी
स्पर्धेला उद्यापासून सुरुवात होणार असून जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात असलेल्या स्पर्धकांना सहभागी होण्यासाठी २९ नोव्हेंबरपर्यंत मुदत आहे. निवड केलेल्या स्पर्धकांची जिल्हास्तर स्पर्धा दि.१० डिसेंबर पूर्वी पार पडणार असून १० जानेवारी २०२२ पूर्वी राज्यस्तर स्पर्धा तर दि.२६ जानेवारी २०२२ रोजी दिल्ली येथे अंतिम स्पर्धा होणार आहे. भाषणासाठी तालुका आणि जिल्हास्तरावर मराठी भाषण ग्राह्य धरले जाणार असून राज्य आणि देशस्तरावर केवळ हिंदी किंवा इंग्रजी भाषेतच भाषण करावे लागणार आहे. स्पर्धकांना वयाचे बंधन असून केवळ १८ ते २९ वयोगटातील स्पर्धक स्पर्धेत सहभागी होऊ शकतात.