⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

देवदर्शन, ग्रामस्थांच्या भेटीगाठीनंतर शेतकऱ्याने घेतला गळफास

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ फेब्रुवारी २०२२ । जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरूच असून निसर्गाची अवकृपा, सततची नापीकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून कळमसरे येथील विष्णु रामदास चौधरी (वय६५) या शेतकऱ्याने आत्‍महत्‍या केल्याचा प्रकार समोर आला आहे. मंगळवारी सकाळी उठल्यानंतर त्यांनी नेहमीप्रमाणे मंदिरात जाऊन देवदर्शन घेतले, सर्वांच्या भेटीगाठी घेतल्या आणि नंतर घरी येत पीठ गिरणीच्या स्टोअर रूमला आत्महत्या केली.

गेल्या दोन वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे कधी अतिवृष्टी तर कधी ढगफुटी यामुळे हातातोंडाशी आलेले पीक वाया गेले. त्यातून बियाणे, किटकनाशके, खते यांची देणी फेडत नाकीनऊ आले. शिवाय पीककर्ज व हात उसनवारीतुन झालेल्या तीन– चार लाखांचा कर्जाचा डोंगर कसा उतरणार, या विवंचनेत विष्णु चौधरी हे बऱ्याच दिवसांपासून नैराश्यात होते. शेतात यावर्षी खर्च करूनही खर्च वजा जाता उप्पन्न न आल्याने ते कर्जबाजारी झाल्याने त्यांनी टोकाची भूमिका घेतली असे कुटुंबियांनी सांगितले. त्यांच्यावर पिककर्ज व हात उसनवारीचे सुमारे साडे तीन लाख रूपयांचे कर्ज असल्याचे निकटवर्तीकडून सांगण्यात आले.

मंगळवारी पत्नी आणि मुलगा काही कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. विष्णू चौधरी यांनी सकाळी नित्य नियमानुसार मंदीरावर जावून सर्वांची भेट घेतली. यानंतर घरी येत त्यांनी आपल्या स्वमालकीच्या पिठाची गिरिणीच्या स्टोअर रूमला साडीचे दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. दुपारी जेवणाला आले नाही; यासाठी तपास केला असता ते गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसुन आले.

नातेवाईकांनी त्यांना तात्काळ अमळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता त्यांना डॉक्टरानी मृत घोषित केले. मृत विष्णु चौधरी यांचे पुतणे देवीदास चौधरी यांच्या खबरीवरुन मारवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली.

हे देखील वाचा :