⁠ 
बुधवार, एप्रिल 24, 2024

शेतकऱ्यांच्या भल्यासाठी कर्जबाजारी तरुण शेतकऱ्याचा सायकलवर ४ हजार किलोमीटरचा प्रवास

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ जानेवारी २०२२ । देशात शेतकऱ्यांची अवस्था बिकट होत असून कर्जाचा डोंगर वाढता आहे. अवकाळीचे संकट आल्याने हाताचा घास देखील हिरवला जात असल्याने शेतकरी आत्महत्या वाढल्या आहे. शेतकऱ्यांविषयी शासनाने अभ्यासपूर्वक निर्णय घ्यावा आणि शेतकरी आत्महत्या कशा रोखल्या जातील याविषयी जनजागृती करण्यासाठी तरुण कर्जबाजारी शेतकरी बाळासाहेब कोळसे यांनी १३ ऑक्टोबर २०२१ रोजी प्रवासाला सायकलवर सुरुवात केली आहे. ४ हजार ५० किलोमीटरचा प्रवास करून ते जळगावात पोहचले असून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन ते पुढील प्रवासाला धुळ्याच्या दिशेने निघाले.

छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात शेतकर्‍यांची बिकट अवस्था झाली आहे. आपला देश कृषीप्रधान देश असल्याने शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याची आवश्यकता आहे. याकरिता शेतकर्‍यांनी पिकविलेल्या शेतमालाला योग्य किंमत मिळावी, एकरी लागणारी ऊस उत्पादन खर्च पकडून शेतकऱ्याला आर्थिक मदत करण्यात यावी, यासह ९ मागण्यांसाठी अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील आडगाव चे शेतकरी बाळासाहेब कोळसे यांनी तब्बल ४ हजार ५० किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला आहे.

बाळासाहेब कोळसे यांनी १३ ऑक्टोबर २०२१ रोजी अहमदनगर येथून सायकल प्रवासाला सुरुवात केली आतापर्यंत त्यांनी २७ जिल्हे व ४ हजार ५० किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला आहे. मंगळवारी दुपारी ते सायकलने जळगावात पोहचले. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची भेट घेत त्यांनी मागण्यांचे निवेदन दिले. त्यानंतर भरारी फाऊंडेशनचे अध्यक्ष दीपक परदेशी आणि कृषी उपसंचालक अनिल भोकरे यांनी त्यांची भेट घेत सहकार्य केले. २७ जिल्हे फिरल्यानंतर २८ वा जिल्हा म्हणजेच जळगावात मला सर्वात चांगला अनुभव आल्याचे त्यांनी जळगाव लाईव्हशी बोलताना सांगितले. या प्रवासाच्या शेवटी मुख्यमंत्री आणि कृषीमंत्र्यांना भेटून मागण्या त्यांच्या समोर ते मांडणार आहेत.

कोळसे म्हणतात, सध्या शेतकऱ्यांची अवस्था बिकट होत चालली असून शेतकऱ्यांची दिवसेंदिवस आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. त्यासाठी गटातटाचे राजकारण सोडून सर्वच पक्षांनी व पदाधिकार्‍यांनी एकत्र येऊन शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. शेतकऱ्यांनी कर्जबाजारी होऊन आत्महत्या करणे हा पर्याय नव्हे. शासनाने कोरोना काळात ज्याप्रमाणे शास्त्रज्ञ नेमले, औषधी दिल्या, उपाययोजना केल्या तशा आमचा बाप शेतकरी मरतो आहे त्यासाठी करणे देखील आवश्यक आहे. शेतकरी मेल्यानंतर त्याच्या कुटुंबियांना मदत देण्याऐवजी तो जिवंत आहे तोवर त्यासाठी काहीतरी करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

या आहेत बाळासाहेब कोळसे यांच्या मागण्या :

  • – शेतकऱ्यांना कमी पडल्यावर मालाची किंमत ठरवता यावी
  • – सरकारकडून देण्यात येणारी मदत उत्पादनखर्च पकडून देण्यात यावी
  • – शेतकऱ्यांच्या शेतमालाला लागणारा उत्पादन खर्च पकडून हमीभाव द्यावा
  • – सर्व शेतकऱ्यांना कर्ज मुक्त करण्यात यावे
  • – नोकर भरतीमधील भ्रष्टाचार करण्यात यावा
  • – शेतकऱ्यांच्या होणार्‍या आत्महत्या थांबवण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यात यावे
  • – शेतकऱ्यांच्या होणार्‍या आत्महत्या करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्या
  • – कर्जबाजारी तणावग्रस्त शेतकऱ्यांना आत्महत्या पासून वाचण्यासाठी शासनाकडून हेल्पलाइन सुरू करण्यात यावी
  • – विज पंपासाठी मोफत वीज देण्यात यावी

हे देखील वाचा :