⁠ 
रविवार, एप्रिल 28, 2024

पीक विमा भरपाईवरुन डॉ. उल्हास पाटलांचा राज्य सरकारवर निशाणा, ७८ हजार शेतकऱ्यांच्या वतीने केली ‘ही’ मागणी

जळगाव लाईव्ह न्यूज | १९ ऑक्टोबर २०२३ | संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ मिळाला असतांना जळगाव जिल्ह्यातील तब्बल ७८ हजार शेतकरी पीक विमाच्या लाभापासून वंचित आहेत. राष्ट्रवादी काँगेसचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी राज्याच्या कृषिमंत्र्यांना पत्र लिहिल्यामुळेच पीकविमा मिळण्यास विलंब होत असल्याचा आरोप शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. या विषयावरील आरोप प्रत्यारोपामुळे मुळ मुद्दा बाजूला पडत आहे. यापार्श्वभूमीवर माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांनी अजित पवार गट, शिंदे गट व भाजपावर निशाणा साधला आहे.

डॉ.उल्हास पाटील म्हणाले की, जळगाव जिल्ह्यातील ७८ हजार शेतकऱ्यांनी पीक विम्याचा प्रिमियम भरला आहे. मात्र त्यांना त्याचा लाभ मिळत नाहीए. तीन्ही पक्षांच्या राजकारणामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. कुठलाही शेतकरी बनावट पध्दतीने बनावट विमा घेण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार करणार नाही. यामुळे ज्या ७८ हजार शेतकऱ्यांनी प्रिमियम भराला आहे. त्यांना सरसकट पीकविमा योजनेचा लाभ द्यावा,अशी मागणी डॉ.उल्हास पाटील यांनी केली आहे. तसेच एकमेकांवर आरोप करत आहेत, तुम्ही इतर वेळी राजकारण करा मात्र यावेळी शेतकऱ्यांना न्याय द्या, अशी मागणीही त्यांनी शेतकरी व काँग्रेसतर्फे केली आहे.

काय आहे वाद ?

केळी पीकविम्यासंदर्भात शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी स्टींग ऑपरेशन केले, शासनस्तरावर प्रधान सचिव कृषी विभाग यांच्याकडे केलेल्या तक्रारीमुळे जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांची केळी पीकविमा रक्कम रखडली असल्याचा आरोप आमदार एकनाथ खडसे यांनी येथे केला. मात्र त्यावर पलटवार करत राष्ट्रवादी काँगेसचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनीच राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना १३ ऑगस्ट २०२३ ला त्यांनी पत्र देऊन जिल्ह्यात बनावट कागदपत्रांच्या आधारावर फळ पीकविमा प्रस्ताव सादर करून फसवणूक केली जात आहे, या प्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी केली आहे. खडसे यांनी दिलेल्या या पत्रामुळे आता शासनाने चौकशी सुरू केली असून, त्यामुळे पीकविमा मिळण्यास विलंब होत आहे, असा आरोप आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

शेतकऱ्यांना १२ टक्क्यांसह पीकविम्याचा लाभ देणार का?

जळगाव जिल्ह्यातील ८१ हजार ६४२ हेक्टर क्षेत्रासाठी ७८ हजारांवर शेतकर्‍यांनी पीकविमा काढला आहे. १८ जून २०२१ च्या शासन निर्णयानुसार पीकविम्याचा कालावधी संपूनही पात्र शेतकर्‍यांना भरपाईची रक्कम कमी-जास्त तापमानाची हेक्टरी ६० ते ७० हजार रुपये तीन आठवड्यांच्या आत अर्थात २१ ऑगस्टपर्यंत, तसेच गारपीट, चक्रीवादळ, अतिवेगाचे वारे यांची नुकसानभरपाई पंचनाम्यानुसार विमा कालावधी संपुष्टात आल्यानंतर ४५ दिवसांच्या आत अर्थात १५ सप्टेंबरपर्यंत पंचनाम्यानुसार नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या खात्यात जमा करणे बंधनकारक होते. मात्र, आता २०२३-२४ साठी नवीन केळीसाठी पीक विमा काढण्यास सुरुवात झाली असली, तरी अजून २०२२-२३ चा पीकविमा पात्र शेतकर्‍यांना मिळाला नाही. १ ते ३१ ऑगस्ट दरम्यान शेतकऱ्यांना विम्याची रक्कम खात्यावर मिळणे आवश्यक असताना एक महिन्याच्या वर वेळ निघून गेली तरी अद्यापही पैसे मिळालेले नाही. दरम्यान, नियमानुसार विमा कंपनीने रक्कम दिली नाही तर १२ टक्के व्याज त्यावर लावून दिले जाते.