⁠ 
सोमवार, मे 6, 2024

खान्देशातील कॅबिनेट मंत्र्यांमुळे काँग्रेसची पंतप्रधान मोदींवर टीका; १० कोटी रुपयांचा मामला

जळगाव लाईव्ह न्यूज | १५ सप्टेंबर २०२३ | राज्याचे आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या कन्या व नंदुरबार जिल्हा परिषदेच्या विद्यमान अध्यक्षा सुप्रिया गावित यांच्या संस्थेला केंद्रीय कृषी मंत्रालयाकडून कृषि उद्योग प्रक्रियेसाठी १० कोटींचे अनुदान मंजूर झाल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. काँग्रेसने यावरून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवरच हल्लाबोल केला आहे. ही ‘भाजप परिवार वाचवा योजना’ असल्याचा आरोप काँग्रेस नेते सचिन सावंत व नाना पटोले यांनी केला आहे.

भाजप नेहमी काँग्रेसच्या परिवार वादावरून टीका करत असते. मात्र भाजपवर देखील परिवार वादाची टीका होत असते. राज्याचे आदिवासी विकास मंत्री यांच्या दोन कन्या असून डॉ. हिना गावित या भाजपच्या खासदार, तर दुसरी कन्या डॉ. सुप्रिया गावित या नंदुरबार जिल्हा परिषदेवर अध्यक्ष आहेत. या परिवार वादावरून काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी टीका केली आहे. दरम्यान, पंतप्रधान किसान संपदा योजनेअंतर्गत सुप्रिया गावित यांच्या रेवा तापी औद्योगिक विकास कंपनीला दहा कोटी रुपयांची सबसिडी मिळाली आहे.

देशभरातील ७० उद्योग कंपन्यांसाठी केंद्राने क्लस्टर मंजूर केला आहे. महाराष्ट्रातील तेरा कंपन्यांना कोट्यवधी रुपयांचे अनुदान या योजनेअंतर्गत मंजूर झाले आहे. यात सुप्रिया गावित अध्यक्ष असलेल्या संस्थेचाही समावेश आहे. सुप्रिया यांच्या रेवा तापी व्हॅली इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट या संस्थेला १० कोटींचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. संदर्भातील यादी ‘एक्स’वरून जाहीर करताना, काँग्रेसचे महाराष्ट्राचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी हे प्रकरण उघडकीस आणले आहे. मात्र नियमांनुसारच हे अनुदान मिळाले असल्याचा खुलासा डॉ. विजयकुमार गावित यांनी केला आहे.

काँग्रेसची थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका

भाजपवर निशाणा साधताना सचिन सावंत म्हणाले, ‘कुंपणानेच शेत खाण्याचा हा प्रकार आहे. केंद्रीय अन्नप्रक्रिया मंत्रालयाने एपीसी योजनेअंतर्गत कृषिप्रक्रिया क्लस्टर प्रकल्पांना मान्यता दिली आणि यात लाभार्थी आहेत, आदिवासी विकासमंत्री डॉ. विजय कुमार गावित यांच्या कन्या सुप्रिया गावित यांची रेवा तापी औद्योगिक विकास कंपनी. पंतप्रधान स्वतःला ‘प्रधानसेवक’ म्हणवतात आणि त्यांच्या पक्षाचे लोक ‘शेख अपनी देख’ तत्त्वज्ञानावर विश्वास ठेवत प्रथम स्वयंसेवेत रमतात. सरकारने जनतेसाठी काम करायचे असते, भाजपचे मंत्री आणि त्यांच्या मुलांसाठी नाही. हा भाजपाचा परिवारवाद नव्हे काय?’