⁠ 
गुरूवार, मे 2, 2024

तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर भरले चिंचपाणी धरण, आ. लताताई सोनवणेंच्या हस्ते जलपुजन

जळगाव लाईव्ह न्यूज । २० ऑगस्ट २०२२ । चोपडा तालुक्यातील व सातपुड्याच्या कुशीत असलेले चिंचपाणी धरण अखेर तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर भरले आहे. त्यामुळे भविष्यात सिंचनासाठी भेडसावणाऱ्या पाण्याची गंभीर समस्या मिटल्याने परिसरातील विस ते पंचवीस गावातील शेतकऱ्यांमध्ये नवचैतन्य संचारले आहे. दरम्यान, आमदार लता सोनवणेयांच्या हस्ते धरणाचे विधीवत जलपुजन करण्यात आले.

चोपडा तालुक्यातील पुर्व भागातील बिडगांवसह धानोरा, देवगाव, पारगाव, मितावली पुणगाव पंचक खर्डी लोणी मोहरद, वरगव्हान, शेवरे, पानशेवडी, बढाई, बढवानी, कुंड्यापाणी आदी गावांना सिंचनाच्या दृष्टीने वरदान ठरणारे चिंचपाणी धरण २०१९ नंतर म्हणजे गेल्या तीन वर्षांपासून भरलेच नव्हते. परिणामी परिसरातील तब्बल २० ते २५ गावातील पाणी पातळी कमालीची घटली होती. अनेक विहिरी कोरड्या पडल्या होत्या. ट्युबवेल्सही तीनशे ते चारशे फूट खोल करूनही पाणी लागत नव्हते. पाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैसा खर्चूनही काही उपयोग होत नव्हता. कर्जाचा डोंगर डोक्यावर वाढतच गेला. परिणामी शेतीवरील मोठा परिणाम होऊन बागायती शेती क्षेत्रात कमालीची घट झाली होती. म्हनून पाणीच नसल्याने शेतकरीही करावे तरी काय या नैराश्यात सापडले होते.

या वर्षी तरी परिसराच्या सिंचनासाठी वरदान ठरणारे चिंचपाणी धरन भरण्याची प्रार्थना करीत होते. सुदैवाने तिन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हे धरण शंभर टक्के भरून वाहू लागल्याने शेतकरींच्या आनंदाला उधाण आले आहे. किमान दोन वर्षे तरी सिंचनासाठी पाण्याची समस्या दुर झाल्याने शेतकरी उत्साहात दिसत आहेत. रब्बीत चांगले उत्पादनाची आस लागली आहे. तर मनमोहक अशा सातपुड्याच्या कुशीत निसर्गरम्य असलेले हे धरण पिकनिक पॉइंट ठरत असून ते पहाण्यासाठी दररोज येथे मोठी गर्दीही होत आहे.