जळगाव लाईव्ह न्यूज । १६ सप्टेंबर २०२१ । पाचोरा तालुक्यातील अंतुर्ली खुर्द येथील ४२ वर्षीय प्राैढ गुरे चारण्यासाठी गेले असता खदानीत पडल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेत एका बैलाचा ही मृत्यू झाला आहे. प्रकाश बळीराम वाघ (वय ४२) असे मृताचे नाव असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त हाेत आहे.

याबाबत असे की, अंतुर्ली खुर्द येथील रहिवासी प्रकाश वाघ हे शेत मजुरी करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते. गेल्या चार दिवसांपासून ते गावातीलच प्रभाकर पोपट पाटील यांच्या शेतात मजुरी करत होते. दरम्यान, १५ रोजी सकाळी गावानजीक असलेल्या पाझर तलावाजवळील सरकारी खदानीलगत ते गुरे चारण्यासाठी गेले हाेते.

या वेळी अचानक प्रकाश वाघ व प्रभाकर पाटील यांच्या मालकीचा बैल पाण्यात पडला. यात प्रकाश वाघ यांच्यासह बैलाचा ही मृत्यू झाला. ही घटना शेजारी शेळ्या व गुरे चारणाऱ्या योगेश भारत पाटील यांच्या लक्षात आली. त्यांनी तत्काळ ग्रामस्थांना घटनेबाबत माहिती दिली. ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन प्रकाश वाघ व बैलाला पाण्यातून बाहेर काढले. तर प्रकाश वाघ यांना तातडीने पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी त्यांना मृत घोषित करुन शवविच्छेदन केले. या प्रकरणी पाचोरा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
तपास हवालदार भगवान बडगुजर करत आहेत. मृत प्रकाश वाघ यांच्या पश्चात पत्नी, २ मुले, २ मुली, भाऊ असा परिवार आहे. घटनास्थळी भाजपचे तालुका सरचिटणीस प्रदीप पाटील, एकलव्य संघटनेचे तालुकाध्यक्ष गणेश वाघ, लहुजी शक्ती सेनेचे तालुकाध्यक्ष आबा गायकवाड, जामनेर तालुकाध्यक्ष जीवन मगरे यांनी भेट दिली.












