⁠ 
गुरूवार, मार्च 28, 2024

सरपंच ते खासदार… रक्षाताईंच्या राजकीय कारकिर्दीचा चढता आलेख

जळगाव लाईव्ह न्यूज  | जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदार संघातील भाजपच्या खासदार रक्षाताई खडसे यांचा आज वाढदिवस. रावेर लोकसभा मतदार संघातून सलग दुसऱ्यांदा त्या निवडून आल्या आहेत. त्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या स्नुषा असून साधी राहणी, स्पष्ट विचार, विकासाचे व्हिजन आणि आपल्या माणसांविषयी आपुलकी हीच त्यांची खरी ओळख. सरपंच पदापासून सुरू झालेला त्यांचा राजकीय प्रवास आज एका उंच टप्प्यावर येऊन ठेपला आहे.

रक्षा खडसे या सन 2010 पासून राजकारणात सक्रिय आहेत. त्यांनी कोथळी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदापासून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. कोथळी (ता. मुक्ताईनगर) च्या त्या सरपंच होत्या. त्यानंतर त्या जिल्हा परिषद सदस्य झाल्या. शिक्षण सभापती असताना त्यांनी वेगवेगळे उपक्रम राबवून आपल्या कार्याचा ठसा उमटवला.

सन २०१४ मध्ये रावेर लोकसभा मतदार संघातून भारतीय जनता पक्षातर्फे त्यांनी निवडणूक लढविली व त्या खासदार झाल्या, त्यानंतर सन २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत पक्षाने त्यांना पुन्हा उमेदवारी दिली, त्या दुसऱ्यांदा याच मतदार संघातून खासदार झाल्या.

रक्षा खडसे या दोन टर्म भाजपच्या खासदार आहेत. 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्या रावेर मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेल्या आहेत. हिना गावित यांच्यासोबत रक्षा खडसे या 17 व्या लोकसभेतील सर्वात तरुण सदस्यांपैकी एक आहेत. रक्षा खडसे यांचा जन्म 12 मे 1987 रोजी झाला होता. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांचे लग्न राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंचे दिवंगत पुत्र निखिल खडसे यांच्याशी झाले होते.

सासरे एकनाथराव खडसे यांनी भारतीय जनता पक्ष सोडल्यानंतर रक्षा खडसे यांच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले, मात्र त्यांनी भारतीय जनता पक्षाचे कार्य सुरू ठेवले भारतीय जनता पक्षाची भूमिका त्या अत्यंत प्रखरतेने मांडतात.

एकनाथ खडसे यांनी गेल्यावर्षी भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर एकनाथ खडसे यांच्या मुलीनेही राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला होता. मात्र, रक्षा खडसे यांनी भाजपमध्येच राहणे पसंत केले होते. मी भारतीय जनता पक्षातच राहणार आहे. भाजपला सोडणार नाही. एकनाथ खडसे यांनी त्यांच्या व्यक्तिगत कारणांमुळे भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. मला भाजपमध्ये कुठलाही त्रास नाही, असे रक्षा खडसे यांनी त्यावेळी म्हटले होते.