जळगाव लाईव्ह न्यूज । १९ डिसेंबर २०२३ । भुसावळ येथून आधी मुंबई जाण्यासाठी पॅसेंजर धावत होती. मात्र, कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे ही पॅसेंजर रद्द आहे. अद्यापही ती सुरु झालेली नसल्याने जिल्ह्यातील प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागतोय. मात्र भुसावळ येथून भुसावळ-बोरिवली, भुसावळ -मुंबई सेंट्रल या गाड्या वेगवेगळ्या वारी धावत आहे. दरम्यान, मुंबई सेंट्रल ते भुसावळ स्पेशल गाडीला विरार येथे थांबा देण्यात आला आहे. या गाडीचे येथील खानदेशवासीयांनी मोठ्या जल्लोषात स्वागत केले.

पूर्वी खानदेश एक्स्प्रेसला विरार थांबा देण्यात आलेला होता. या कारणास्तव वसई-विरार भागात राहणाऱ्या खानदेशी रहिवाशांना दिलासा मिळाला होता. खानदेश एक्स्प्रेस आठवड्यातून तीन दिवस असते. या गाडीला वसई-विरारमधून उत्तम प्रतिसाद मिळत असतो.
याच पार्श्वभूमीवर उर्वरित नसलेल्या दिवशी एका नवीन गाडीची मागणी वाढू लागली. मागणीची दखल घेऊन ०९०५१/०९०५२ ही मुंबई सेंट्रल ते भुसावळ स्पेशल गाडी वर्षभरापूर्वी सुरू करण्यात आली; परंतु या गाडीला विरार थांबा देण्यात आलेला नव्हता. या गोष्टीची दखल घेत माजी नगरसेविका सुरेखा कुरकुरे, खानदेश मित्र मंडळाचे अध्यक्ष कैलास पाटील, उपाध्यक्ष बाळू पाटील यांच्यासह सर्व पदाधिकारी, सदस्य तसेच अर्नाळ्याचे सतीश पाटील या सर्वांच्या वतीने रेल्वेला सातत्याने पत्रव्यवहार करण्यात आला होता.
मागणीला यश मिळाले असून शुक्रवारी गाडी क्रमांक ०९०५१ ला विरार स्थानकावर थांबा देण्यात आला. याचे खानदेश मित्र मंडळाच्या सदस्यांनी जल्लोषात स्वागत केले. या वेळी सुरेखा कुरकुरे यांच्या हस्ते मोटरमनला पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.