⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

गिरीशभाऊ…सब घोडे बारा टक्के नसतात

जळगाव लाईव्ह न्यूज । २० ऑगस्ट २०२१ । काही दिवसांपूर्वी माजी मंत्री आ.गिरीश महाजन यांनी सुनील झंवर हे माझ्यासह सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांचे निकटवर्तीय आहेत. असे वक्तव्य केले होते. विशेष म्हणजे या वक्तव्याचे कोणत्याही राजकीय पक्षाने खंडन केले नव्हते. परंतु, आता काँग्रेसचे प्रदेश सचिव डी. जी. पाटील यांनी महाजन यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला असून, गिरीशभाऊ… सब घोडे बारा टक्के नसतात’ असा टोला लगावला आहे. तर महाजन यांनी यापुढे फक्त स्वतः किंवा त्यांच्या पक्षापुरते मर्यादित बोलावे, असा सल्लाही पाटील यांनी दिला आहे.

बीएचआरप्रकरणी मुख्य संशयित सुनील झंवर यास नुकतीच अटक केली. तसेच झंवरच्या कार्यालयात अनेक राजकीय नेत्यांशी संबंधित कागदपत्रे सापडल्याची चर्चा आहे. दरम्यान, झंवरला अटक झाल्यानंतर झंवर हे माझ्यासह सर्वच नेत्यांचे निकटवर्तीय आहेत, कुणी नाही म्हणून दाखवावं…असे वक्तव्य आमदार गिरीश महाजन यांनी केले होते. यावर आक्षेप घेत काँग्रेसचे प्रदेश सचिव डी. जी. पाटील यांनी महाजन यांच्या वक्तव्याचा समाचार घेत, झंवरशी ज्याचे संबंध आहे ते कबूल करतील. परंतु, घोटाळ्यातील संशयितासोबत विनाकारण इतर राजकीय पक्षाचे जोडू नये. खासकरून काँग्रेसच्या बाबतीत तर बोलूच नये, असा सल्ला पाटील यांनी दिला आहे.

झंवरला कधी पाहीलेही नाही…
अगदी व्यक्तिगत बोलायचे झाले तर सुनील झंवर हा माझ्या तालुक्यातील असल्यानंतरही ते काळे आहेत की गोरे हे आम्ही पाहिलेले नाही. त्यामुळे झंवरसोबतच्या संबंधांवर महाजन यांनी सर्व पक्षांना गृहीत धरू नये. स्वतःचे संबंध असल्याचे महाजन यांनी मान्य केलेय. परंतु, सब घोडे बारा टक्के असे समजणे चुकीचे आहे. त्यामुळे यापुढे बोलताना महाजन यांनी विचार करावा. त्यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्याकडून असे शब्द बरोबर नाहीत, असेही पाटील यांनी म्हटले आहे.