⁠ 
गुरूवार, मे 2, 2024

जळगावकरांसाठी खुशखबर: ‘ही’ एक्स्प्रेस मनमाडऐवजी आता भुसावळ येथून सुटणार

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ डिसेंबर २०२३ । जळगावकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मनमाड-सिकंदराबाद अजंता एक्स्प्रेस (Manmad-Secunderabad Ajanta Express) ही गाडी मनमाडऐवजी भुसावळ (Bhusawal Railway Station) येथून सोडण्यात येणार असल्याची माहिती रेल्वेचे महाव्यवस्थापक आर. के. यादव यांनी दिली आहे. याबाबत रेल्वे मंडळाला प्रस्ताव पाठवण्यात येणार असल्याची माहिती आहे.

भुसावळ विभागातून दरराेज २०० पेक्षा जास्त प्रवासी गाड्या धावतात. मात्र, भुसावळ, जळगाव येथून सिकंदराबादला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर असून सिकंदराबाद येथे जाण्यासाठी आठवड्यातून फक्त तीनच गाड्या आहेत. त्यातही या गाड्यांना चाळीसगाव, पाचोरा स्थानकावर थांबा नसल्याने प्रवाशांची गैरसोय होते. ही गैरसोय दूर करण्यासाठी आता दररोज मनमाड येथून सिकंदराबादला धावणारी अजंता एक्स्प्रेस मनमाडऐवजी भुसावळ येथून सोडण्याचा निर्णय विचारात घेऊन याबाबत रेल्वे मंडळाला प्रस्ताव पाठवण्यात येणार असल्याची माहिती आहे.

दरम्यान, सिकंदराबाद-मनमाड अजिंठा एक्स्प्रेस ही गाडी मनमाड येथे सायंकाळी सातला येते, यानंतर सकाळी ७ वाजता ती सिकंदराबादकडे रवाना होते. यादरम्यान तब्बल १२ तास ही गाडी मनमाड स्थानकावर उभी असते. त्यामुळे या गाडीला भुसावळपर्यंत आणण्यासाठी वेळेची कोणतीही अडचण नाही. शिवाय भुसावळला गाडीची देखभाल करता येईल, यासाठी रेल्वे मंडळाकडे तसा प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे. ही गाडी भुसावळपर्यत वाढवल्यास भुसावळ, जळगाव, पाचाेरा, चाळीसगाव येथील प्रवाशांना फायदा होईल.