⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

खडसे – मुंडे भेटीनंतर ‘माधव’ फॉर्म्युला आणि ओबीसी राजकारणावर चर्चा का होतेय?

जळगाव लाईव्ह न्यूज | डॉ.युवराज परदेशी | राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये अर्धा तास चर्चा झाली. पंकजा मुंडे यांच्या दोन दिवसांपूर्वी ‘मी पक्षाची आहे पण भाजप पक्ष माझा आहे का?’ असे म्हणत आपल्या नाराजीला वाट मोकळी करून दिली होती. याच पार्श्‍वभूमीवर नाराज पंकजा मुंडे व भाजपातून राष्ट्रवादीत गेलेले एकनाथ खडसे या नेत्यांमध्ये पहिल्यांदाच उघड भेट झाल्याने या भेटीची चर्चा होणारच! विशेष म्हणजे या भेटी नंतर भाजपाच्या ‘माधव’ फॉम्युल्यावर देखील चर्चा सरु झाली आहे.

स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या नवव्या स्मृतिदिनाचे औचित्य साधत या नेत्यांमध्ये गोपीनाथ गडावर भेट झाली. या पूर्वी १२ डिसेंबर २०१९ रोजी गोपीनाथ मुंडेंच्या जयंतीदिनी एकनाथ खडसेंनी गोपीनाथगडावर हजेरी लावली होती. त्यावेळी झालेल्या भाषणात नाथाभाऊंनी स्वपक्षावर तोफ डागत पक्ष सोडण्याचे संकेत दिले होते. यावेळी नाथाभाऊंनी पंकजांनाही पक्षाबद्दल लवकर निर्णय घेण्याचा सल्लाही दिला होता. मात्र त्यांनी भाजपात राहून अधून मधून स्व पक्षावर टीका करण्याचे धोरण अवलंबले, तरीही पक्षाने त्यांची दखल घेतली नाही.

एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर त्यांना शरद पवारांनी विधान परिषदेवर पाठविलं तेथे विधिमंडळ गटनेते पदाची जबाबदारीही दिली. खडसेंच्या माध्यमातून भाजपातील नाराजांना गळाला लावण्याचे प्रयत्न राष्ट्रवादीकडून सुरु आहेत. मात्र अद्यापतरी त्यांना मोठं यश मिळालं नाही. आता पक्षावर नाराज असलेल्या पंकजा मुंडेंना खडसेंच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून जवळ करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामुळे खडसे-मुंडे यांची भेट महत्वपूर्ण मानली जात आहे.

वनप्लसचे सर्व Smart Tv झाले स्वस्त

काय आहे ‘माधव’ फॉर्म्युला

महाराष्ट्रात स्थापनेपासून भाजपाची ओळख ही ‘शेटजी-भटजीं’चा पक्ष अशीच होती. म्हणजे, ब्राह्मण आणि मारवाडी समाज भाजपसोबत असायचा. ही मर्यादित ओळख मिटवून पक्षाला जनाधार मिळावा म्हणून सत्तर-ऐंशीच्या दशकात वसंतराव भागवतांनी महाराष्ट्रात ‘माधव’ हा फॉर्म्युला आणला. ‘माधव’ म्हणजेच माळी, धनगर आणि वंजारी, असा तो फॉर्म्युला होता. महाराष्ट्रातल्या राजकारणात निर्णायक ठरणार्‍या या तीन समाजाची मोट बांधत भाजपचे दिवंगत नेते वसंतराव भागवतांनी पक्षात ओबीसी नेतृत्व तयार केलं. याच माधव फॉर्म्युल्यातून गोपीनाथ मुंडे, एकनाथ खडसे, पांडुरंग फुंडकर हे मोठे ओबीसी नेते उदयाला आले. मुंडे-महाजन-खडसे-फुंडकरांनी या पक्षाला बहुजन चेहरा प्राप्त करून दिला.

भाजपतल्या गेल्या काही महिन्यांमधील घटना पाहाता भाजपनं ‘माधव’ फॉर्म्युला बाजुला ठेवला आहे का? असा प्रश्‍न उपस्थित होणे स्वाभाविकच आहे. कारण सध्या माधव फॉर्म्युल्यातील कुणीच भाजपकडे उरले नाहीत. गोपीनाथ मुंडे व पांडुरंग फुंडकर आज हयात नाहीत. भाजपमधील ओबीसी चेहरा म्हणून एकनाथ खडसे यांची ओळख होती. विशेषत: गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर महाराष्ट्र भाजपमधील ओबीसी चेहरा म्हटल्यावर खडसेंचं नाव पुढे येई. मात्र एकनाथ खडसेंनी भाजपाला सोडचिठ्ठी दिली आहे. मुंडे कुटुंब आहे, पण ते नाराज आहेत. माळी समाजाचा मोठा नेता भाजपकडे नाही. धनगर समाजाचे महादेव जानकर आहेत, पण तेही पंकजा मुंडेंच्या बाजूचे आहेत. त्यात आरक्षण न दिल्याने धनगर समाज नाराज आहे.