⁠ 
मंगळवार, एप्रिल 16, 2024

अभाविपने विद्यापीठ सुधारणा विधेयकाची केली होळी

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० डिसेंबर २०२१ । विद्यापीठ कायदा सुधारणा विधेयक विधानसभेत पारित केल्याच्या निषेधार्थ कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वार येथून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने विद्यार्थी आक्रोश मोर्चा काढून प्रतीकात्मक सुधारणा विधेयक पुतळ्याची होळी करण्यात आली.

सविस्तर असे की, विधानसभेत २८ डिसेंबर रोजी विद्यापीठ कायदा सुधारणा विधेयक पारित करण्यात आले. यामध्ये विद्यापीठाच्या स्वायतत्तेवर घाला घालत स्वतच्या राजकीय स्वार्थासाठी विद्यापीठ कायद्यामध्ये बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या या निर्णयामुळे राज्यातील सर्व शासकीय विद्यापीठाचे कुलपती असणारे राज्यपाल हे देखील कुलगुरूंची थेट नियुक्ती करू शकणार नाही. यापुढे कुलगुरू निवड राज्यशासनाने सुचवलेल्या दोन नावांमधूनच राज्यपाल करावी लागेल. राज्य शासन पूर्णपणे कुलपती अधिकारात हस्तक्षेप करीत आहे. विद्यापीठामध्ये कुलपती पदावर प्र. कुलपती म्हणून एक नवीन पद निर्माण करण्यात येणार असून त्यापदी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. यावरून विद्यापीठांच्या स्वायतत्तेवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न राज्यशासन करीत आहे. यावरून स्पष्टपणे राजकीय पक्ष, नेते यांचा अवाजवी हस्तक्षेप निर्णय प्रक्रियेत वाढत असल्याचे दिसून येत आहे.

या निर्णयाने सर्व गुणवत्ताधारक प्राध्यापक, विद्यार्थी यांच्यावर विपरीत परिणाम राजकीय दबावाने होऊ शकतो. विद्यार्थ्यांना प्रत्येक निर्णयामध्ये राज्य शासनाकडे बघावे लागेल. विद्यापीठांची गुणवत्ता पूर्णपणे ढासळण्याची शक्यता या निर्णयाने निर्माण होत आहे. विद्यापीठाच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे राजकीयकरण या निर्णयामुळे होईल. या सर्व विषयांना घेऊन अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जळगाव तर्फे कुलसचिवांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देत कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामध्ये विद्यार्थी आक्रोश मोर्चा काढून प्रतीकात्मक सुधारणा विधेयक पुतळ्याची होळी करण्यात आली. तसेच हा कायदा विद्यार्थी हिताचा विचार करून तात्काळ रद्द करावा व विद्यापीठाची स्वायत्तता अबाधित राखावी अन्यथा विद्यार्थी परिषद राज्यभर रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशारा अभाविपच्या वतीने करण्यात आला. तसेच हा निर्णय मागे न घेतल्यास राज्यभर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

यावेळी नगरमंत्री आकाश पाटील, नगरमंत्री मयूर माळी व नितेश चौधरी यांनी भावना व्यक्त केल्या. या विद्यार्थी आक्रोश मोर्चामध्ये विविध महाविद्यालयाचे 100 पेक्षा अधिक विद्यार्थी, विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. या विद्यार्थी आक्रोश मोर्चाचे नेतृत्व राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य रितेश महाजन यांनी केले.

हे देखील वाचा :