⁠ 
गुरूवार, मार्च 28, 2024

आत्याच्या घरी जातो सांगून घरातून निघाला, पण वाटेतच मृत्यूला कवटाळले

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ मे २०२३ । जामनेर तालुक्यातील पहूर कसबे येथील २३ वर्षीय तरुणाने पळसखेडा शिवारातील शेतात विजेच्या खांबाला वायरचा गळफास करून आत्महत्या केल्याची घटना समोर आलीय. अक्षय संतोष सोनवणे असं मृत तरुणाचं नाव असून याबाबत सोयगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अक्षय संतोष सोनवणे हा तरुण पळसखेडा (छत्रपती संभाजीनगर) येथील आत्या चंदाबाई क्षीरसागर यांच्याकडे मजुरी करण्यासाठी राहत होता. अधून-मधून तो गावी पहूरला यायचा. दरम्‍यान बुधवारी (१७ मे) सकाळी साडेसहाला मजूरीवर न जाता तो पहूरला गावी जातो; असे सांगून आत्याच्या घरून निघाला. मात्र तो पहूरला पोहोचलाच नाही. वाटेतच पळसखेडा शिवारातील संतोष बोऱ्हाडे यांच्या शेतात विजेच्या खांबाला वायरचा गळफास करून त्याने मृत्यूला कवटाळले.

आत्महत्येचा पाचवा प्रयत्न
अक्षयने या अगोदरही चार वेळा स्वतःला संपविण्याचा प्रयत्न केला होता. परंतु कधी भावाने तर कधी शेजारच्यांनी त्याला यातून बाहेर काढले होते. आज मात्र त्‍याने आत्‍महत्‍येचा केलेला प्रयत्‍न अखेरचा ठरला. अक्षयच्या अकाली जाण्याने विधवा आईवर दुःखाचा डोंगरच कोसळला. सोयगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास निलेश लोखंडे करीत आहेत.