⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

नांद्रा येथील सीआरपीएफचे जवान रविंद्र पाटील सेवानिवृत्त

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ ऑक्टोबर २०२१ । पाचोरा तालुक्यातील नांद्रा येथील रहिवासी व सीआरपीएफचे जवान रवींद्र एकनाथ पाटील हे २० वर्ष ५ महिन्याच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. रविवार दि.३ रोजी त्यांचे नांद्रा गावी आगमन झाल्यांनतर ग्रामस्थांनी त्यांचे जोरदार स्वागत केले.

रवींद्र पाटील हे २००१ साली नागपूर येथे सीआरपीएफमध्ये भरती झाले होते. ते लहान असताना त्यांचे वडील एकनाथ महादु पाटील यांचे निधन झाले होते. त्यांच्या निधनानंतर रवींद्र पाटील यांच्या आई निथळबाई एकनाथ पाटील यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी आली होती. निथळबाई पाटील यांना तीन मुले व दोन मुली असे पाच अपत्य होते. त्यांनी शेतात मोलमजुरी व कष्ट करून आपल्या पाच मुलांना चांगले शिक्षण व संस्कार दिले. रवींद्र पाटील हे घरात सर्वात लहान असल्याने त्यांचे शिक्षण नांद्रा येथे पूर्ण झाले. त्यांची देशसेवा करण्याची जिद्द व चिकाटीमुळे ते कमी वयातच २००१ साली नागपूर येथे भरती झाले. रवींद्र पाटील हे दि.3 ऑक्टोबर रोजी आपल्या भारत मातेची २० वर्ष ५ महिने अशी प्रदीर्घ सेवा करून नांद्रा येथे परतले आहेत. त्यांनी सीआरपीएफच्या ९७ बटालियनमध्ये श्रीनगर, चंदिगड, छत्तीसगड, आसाम, गडचिरोली, चेन्नई अशा विविध ठिकाणी सेवा बजावली आहे. रवींद्र पाटील यांचे गावात आगमन झाल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम गावाचे दैवत श्री महादेव महाराजांचे व गावातील छत्रपती शिवाजी महाराजांचे शिवस्मारकाचे दर्शन घेतले. त्यानंतर गावाच्यावतीने सकाळी ११ वाजता ग्रामपंचायत समिती नांद्रा यांच्याकडून शाल श्रीफळ देऊन व प्रा.यशवंत पवार यांच्याकडून मेडल देऊन त्यांचा गौरव व सत्कार करण्यात आला.

यावेळी उपसरपंच शिवाजी तावडे, विनोद तावडे, माजी सरपंच सुभाष तावडे, तंटामुक्ती अध्यक्ष सुभाष पाटील, ग्रामपंचायत सदस्य किशोर खैरनार, योगेश सूर्यवंशी, बंटी सूर्यवंशी, पंकज बाविस्कर, विनोद पाटील, प्रकाश पाटील, भिका पाटील, दिलीप पाटील, योगेश्वर तावडे, अनिल पाटील, दिगंबर पाटील, राजेंद्र पाटील, शालीक मिस्तरी, शिवाजी पाटील, सुट्टीवर आलेले सैनिक गणेश पाटील, प्रशांत पाटील, बबलू पाटील, राहुल पाटील, पत्रकार किरण सोनार यांसह गावातील ज्येष्ठ नागरिक, मित्र परिवार व नातेवाईक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. यशवंत पवार यांनी केले. यशस्वीतेसाठी विजय पाटील, सोनू पाटील, विकी पाटील व गावकऱ्यांनी परिश्रम घेतले.