⁠ 
मंगळवार, एप्रिल 30, 2024

विरावलीत समस्यांनी थैमान घातलं, उपाययोजना करा अन्यथा..

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ नोव्हेंबर २०२२ । विरावली गावात मोठ्या प्रमाणात समस्यांनी थैमान घातलं असून नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. याबाबत सरपंचांना वेळोवेळी मासिक बैठकीमध्ये तसेच तोंडी लेखी सूचना देण्यात आल्या मात्र, त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. दरम्यान, यावल राष्ट्रवादी युवक अध्यक्ष तथा विरावली ग्रा.प.सदस्य ॲड. देवकांत पाटील यांनी याबाबत ग्रामपंयातीला निवेदन दिले असून आता तरी सरपंच याकडे लक्ष घालतात का? हे पाहणे तितकेच महत्वाचे आहे.

यावल तालुक्यातील विरावली गावात मोठ्या प्रमाणात समस्यांनी थैमान घातलं आहे. विशेष म्हणजे, वार्ड क्रमांक तीन मधील नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. गटारांची अवस्था अत्यंत खराब- दयनीय झाली असून नवीन गटार बांधकाम करावे. गावातील मेन रस्त्याचा गटारीवरील धापा पाच ते सहा महिन्यापासून तुटलेला असून वाहने जेजा करताना अपघात झाल्यास शारीरिक, आर्थिक हानी होण्याची शक्यता आहे. शिवाय रस्त्याने चालताना त्या गटारीच्या धाप्यावरून लहान मुल म्हातारे माणसे यांचे पाय गटारीच्या अस्वच्छ, दुर्गंधी, पाण्याने खराब होत आहे. वाहने त्या (ध्याप्यावर ) गटारीमध्ये आपटली जातात त्या वाहन खराब होण्याची ही शक्यता नाकारता येत नाही. त्याचप्रमाणे गावातील सार्वजनिक पाण्याचे कुंड खराब अवस्थेत असून त्याच्या आजूबाजूला देखील मोठ्या प्रमाणात चिखल होऊन घाणीचे साम्राज्य निर्माण झालेले आहे. त्याची दुरुस्ती करून तेथे उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे.

पंधरा वित्त आयोग निधीतून खालचे गाव फ्लेवर ब्लॉक बसवणे त्याचप्रमाणे गावात जाणारा मुख्य रस्ता त्याचे कॉंक्रिटीकरण करणे अत्यंत आवश्यक आहे. कारण पावसाळ्यात चिखल झाल्यामुळे या मुख्य रस्त्यावरून चालणे अवघड होऊन जाते. लहान मूल म्हातारी माणसे यांना पायी चालणे शक्य होत नाही, वाहन चालवताना देखील तारेवरची कसरत करावी लागते. यापूर्वीही ग्रामपंचायतला सरपंच सचिव यांना निवेदन दिले आहे. तरी या मुख्य रस्त्यावर कॉंक्रिटीकरण प्राधान्य क्रमाने करणे आवश्यक आहे वार्ड क्रमांक 2 मध्ये सार्वजनिक मुतारी ची मागणी मासिक मीटिंगमध्ये अनेक वेळा केली गेली त्या कडेही दुर्लक्ष होत आहे. वार्ड क्रमांक एक मधील शेजारी असणाऱ्या नाल्यात सांडपाणी साचले जात असून त्यातून आरोग्यास धोका निर्माण झाला आहे तरी त्या सांड पाण्याचे सुनियोजन करून नाल्याचे खोलीकरण करणे गाळ काढणे आवश्यक आहे. अश्या अनेक समस्या या गावात असून याबाबत सरपंचांना वेळोवेळी मासिक बैठकींध्ये तसेच तोंडी लेखी सूचना देण्यात आल्या मात्र त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

दरम्यान, यावल राष्ट्रवादी युवक अध्यक्ष तथा विरावली ग्रा.प.सदस्य ॲड. देवकांत पाटील यांनी याबाबत ग्रामपंयातीला निवेदन दिले असून सदर मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्या, अशी मागणी केली आहे. तसे झाल्यास विरावली गावातील नागरिक व राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून लोकशाही मार्गाने आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही देण्यात आला आहे.