जळगाव लाईव्ह न्यूज । ४ ऑक्टोबर २०२२ । गेल्या काही काळात वाढत्या महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडी मोडून काढली आहे. मात्र सणासुदीत काहीसा दिलासा मिळाला आहे. त्यातच दिवाळी तोंडावर शिंदे-फडणवीस सरकारने राज्यातील शिधापत्रिकाधारकांसाठी एक मोठा निर्णय घेत दिलासा मिळणार आहे. सरकारकडून रेशन कार्ड धारकांना 100 रुपयात रवा, डाळ, साखर आणि तेल हे साहित्य देणार आहे. मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

दिवाळी तोंडावर आल्याने कमी कालावधीत नागरिकांना या वस्तूंचा पुरवठा करावा, यासाठी अन्न व नागरी पुरवठा विभागाने प्रचलित निविदा प्रक्रियेला छेद देत, यावेळी थेट वायदे बाजारातून या वस्तूंची खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे १ कोटी ७० लाख कुटुंबांना म्हणजेच ७ कोटी लोकांना प्रत्यक्ष लाभ होणार आहे. शिधा पत्रिका धारकांना रवा, चणाडाळ, साखर व तेल (प्रत्येकी एक किलो पॅकेज) केवळ शंभर रुपयांत दिले जाणार आहेत.

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील घेतलेले महत्वाचे निर्णय
शिधापत्रिकाधारकांना मिळणार शिधा वस्तूंचे दिवाळी पॅकेज. 1 कोटी 70 लाख कुटुंबांना म्हणजेच 7 कोटी लोकांना प्रत्यक्ष लाभ. रवा, चणाडाळ, साखर व तेल (प्रत्येकी एक किलो पॅकेज) केवळ शंभर रुपयांत देणार – (अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग)
आपत्ती व्यवस्थापनातील प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी केंद्र किंवा राज्य सरकारच्या कंपन्यांना प्रकल्प अंमलबजावणी यंत्रणा म्हणून नेमणार – (मदत व पुनर्वसन विभाग)
पोलीस दलातील अधिकारी आणि अंमलदारांना पूर्वीप्रमाणेच घरबांधणीसाठी बँकांमार्फत कर्ज देणार – (गृह विभाग)
नागपूर मेट्रो रेल प्रकल्पास गती मिळणार. सुधारित खर्चास मान्यता – (नगर विकास विभाग)
भंडारा जिल्ह्यातील सुरेवाडा उपसा सिंचन योजनेस गती देणार. योजनेस सुधारित प्रशासकीय मान्यता – (जलसंपदा विभाग)
उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यातील कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पास गती देणार. खर्चास सुधारित मान्यता. 8 दुष्काळी तालुक्यांना फायदा – (जलसंपदा विभाग)












