जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जुलै २०२२ । बाजारात केळीची मागणी वाढल्याने आणि निर्मिती कमी झाल्याने केळीने आतापर्यंतच्या इतिहासातील उच्चांकी २ हजार ७० रुपये क्विंटलचा भाव गाठला आहे.

गेल्या वर्षी जून ते ऑगस्ट महिन्यात केळीवर सीएमव्ही रोगाचा प्रादुर्भाव झाला. त्यात रावेर, यावल तालुक्यातील सुमारे ५ हजार हेक्टरवरील रोग ग्रस्त केळी शेतकऱ्यांनी उपटून फेकली. यानंतर मे, जून मध्ये लागवड झालेली केळी वातावरणातील बदलाने चार महिन्यांत निसवण होऊन सात महिन्यांनी म्हणजेच डिसेंबर, जानेवारीमध्ये कापली गेली. यामुळे सध्या कापणी योग्य केळी उपलब्ध नाही. नेमके या काळात बाजारातून मागणी वाढल्याने केळीने आतापर्यंतच्या इतिहासातील उच्चांकी २ हजार ७० रुपये क्विंटलचा भाव गाठला.

{ जुलै ते सप्टेंबरदरम्यान लागवड झालेल्या केळीचा माल जून, जुलैमध्ये निघतो. यंदा जूनमध्ये पाऊस नसल्याने माल तयार झाला नाही. १० हजार केळी खोडातून ४ तेे ५ दिवसांआड १५० क्विंटल कापणी होते. यंदा ती आठ दिवसांआड केवळ ५० क्विंटलपर्यंत होती. { सोलापूर, कोल्हापूर, सूरत, दक्षिण भारत या भागांतून केळी कापणी बंद आहे. यामुळे सध्या केवळ जळगाव जिल्हा व मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर परिसरातील केळी उपलब्ध आहे. पण, हे प्रमाण कमी असल्याने केळी भावात वाढ झाली आहे. { उत्तर भारतातील जम्मू काश्मीर, लडाख भागात १५० क्विंटलच्या ५० ट्रक केळीची दररोज मागणी असते. सध्या ती कायम आहे. मात्र, केवळ १५ ते २० ट्रक केळीचा पुरवठा होत आहे. मागणी असूनही आपण पुरवठा करु शकत नाही, अशी स्थिती आहे.
८५ टक्के निर्यात बंद रावेर, यावल तालुक्यातून इराण, इराक, ओमान, दुबई आदी आखाती देशांमध्ये केळीची निर्यात केली जाते. मात्र, निर्यात दर्जाची केळी उपलब्ध नाही. परिणामी ८५ टक्के निर्यात बंद झाली आहे. जळगावातून देशांतर्गत केळीचा पुरवठा कमी झाला आहे. सध्या फिलीपिन्स, कोलंबिया, पनामा या देशांतून अरब देशांना केळीचा पुरवठा होत आहे.
सात वर्षांतील उच्चांकी दर
२०१६ – १२७५
२०१७ -१५५०
२०१८ -१५००
२०१९ -१६१०
२०२० -१३००
२०२१ – १३१०
२०२२ -२०७०







