⁠ 
मंगळवार, एप्रिल 30, 2024

संपकरी एसटी कर्मचार्‍यांवर गुलाबराव पाटलांनी केला हा आरोप ; म्हणाले..

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ मार्च २०२२ । ‘एसटी महामंडळ विलीनीकरण करता येणार नाही, हे आधीच स्पष्ट झालं आहे. त्यामुळे राज्य सरकारने संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना ३१ मार्चपर्यंत संप मागे घेण्याचा अल्टिमेटम दिलेला असून अल्टिमेटम संपण्यास आता अवघे काही तास उतरले आहेत. तरीही देखील एसटी कर्मचारी संपावर ठाम आहे. दरम्यान, संपकरी एसटी कर्मचार्‍यांच्या भूमिकेवर पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. संपकरी एसटी कर्मचाऱ्यांचे नेते कर्मचाऱ्यांना चुकीचा मार्ग दाखवत असल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा अतिरेक होत असल्याचा आरोप गुलाबराव पाटील यांनी केला.

कर्मचाऱ्यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी कामावर यावं
मागील तीन महिन्यांपासून एसटी महामंडळ विलीनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचारी आंदोलनावर ठाम आहे. विलीनीकरण करता येणार नाही, असा समितीचा अहवाल राज्य सरकारने स्वीकारला आहे. त्यामुळे राज्य सरकारने ३१ मार्चपर्यंत संप मागे घेण्याची मुदत कर्मचाऱ्यांना दिली आहे. राज्य सरकारने आवाहन केल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर हजर व्हायला हवं. जनतेचे होणारे हाल पाहता एसटी कर्मचाऱ्यांनी संप कायम ठेवण्यावर विचार करण्याची गरज आहे. सर्व संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी हिंदू नववर्षाच्या म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी कामावर यावं, असं आवाहन मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं आहे.

एसटी कर्मचाऱ्यांची दिशाभूल :

एसटी कर्मचाऱ्यांची त्यांचे नेते दिशाभूल करत असून त्यांना चुकीचा मार्ग दाखवत आहे. असं सांगत मंत्री गुलाबराव पाटील यांनी कर्मचाऱ्यांचे वकील ऍड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर निशाणा साधलाय. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा अतिरेक होत असल्याचा आरोपही त्यांनी केलाय.