जळगावात चंद्रशेखर बावनकुळे यांचा खडसेंना टोला; म्हणाले….

जुलै 23, 2021 3:08 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ जुलै २०२१ । माजी मंत्री एकनाथराव खडसे हे आमचे ज्येष्ठ नेते होते. देवेंद्र फडणवीस सरकारातील प्रत्येक जण त्यांचे मार्गदर्शन घेत होता. पक्षात त्यांना कुठलाही त्रास नव्हता परंतु कुठे माशी शिंकली ते समजले नाही. कोणताही मोठा नेता पक्ष सोडून गेला तरी पक्षाला काही फरक पडत नाही. एकनाथ खडसेंनी भाजप सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला. परंतु, राष्ट्रवादीत जाऊन त्यांना काय मिळाले? प्रवेश करताच त्यांना मंत्रिपद का दिले नाही? असा प्रश्‍न भाजपचे माजी नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित करून अप्रत्यक्षपणे खडसेंना टोला लगावला.

bavankule khadse

भाजयुमोतर्फे राबविण्यात येत असलेल्या ‘युवा वॉरियर’ अभियानांतर्गत जळगावी आले असता पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या पत्रकार परिषदेला भाजपचे जिल्हाध्यक्ष आ. राजूमामा भोळे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजनाताई पाटील, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, भाजयुमो प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

श्री. बावनकुळे म्हणाले, महाविकास आघाडी सरकारने राज्यात एकही पालकमंत्री काम करत नाहीत. मंत्री आपल्या पदाचा वापर केवळ स्वतःच्या स्वार्थ व मतदारसंघासाठी करीत आहेत. राज्याची चिंता सरकारला नाही. विदर्भात एक हजार कोटींचा तांदूळ घोटाळा झाला. आता रेशनचा तांदूळही या सरकारला पुरला नाही, असे या सरकारचे काम आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत जनता सरकारला जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही,राज्यात सर्वत्र पाऊस होत असताना उत्तर महाराष्ट्र कोरडा असून या भागात दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणीही बावनकुळे यांनी केली.

एकनाथ खडसेंबाबत विचारले असता बावनकुळे म्हणाले, एकनाथ खडसेंचे भाजप वाढविण्यात मोठे योगदान होते. पक्षात त्यांचा आदर व सन्मानच होता. त्यांच्या नेतृत्वात अनेक वर्षे पक्षाचे आमदार काम करत होते. फडणवीसही त्यांचा आदर करतात. खडसेंनी पक्ष सोडला हा त्यांचा निर्णय होता. भाजपने त्यांच्यावर अन्याय केला, असे म्हणणे चुकीचे आहे. खडसे नसले तरी जिल्ह्यातील लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्था, पंचायत समित्यांची निवडणूक भाजपच जिंकणार असाही विश्वास चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now