जळगाव लाईव्ह न्यूज । कर्जबाजारीपणा आणि वैयक्तिक आयुष्यातील नैराश्याला कंटाळून खेडी येथील तरुण शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन जीवनयात्रा संपविल्याच दुर्दैवी घटना समोर आली आहे. श्याम सुनील पाटील (वय ३२) असं मयत तरुणाचे नाव असून २७ जुलै रोजी त्यांचा मृतदेह शेतातील विहिरीत आढळून आला. या घटनेमुळे खेडी गावावर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २६ जुलै रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास श्याम पाटील हे कोणालाही काही न सांगता घरातून बाहेर पडले. बराच वेळ होऊनही ते घरी परतले नसल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला. शोधादरम्यान गावालगतच्या शेतातील विहिरीत त्यांचा मृतदेह आढळून आला. ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी अमळनेर ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. शवविच्छेदनानंतर दुपारी अडीच वाजता शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणी मारवड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

श्याम पाटील यांच्याकडे अवघी दीड एकर शेती होती. डोक्यावर कर्जाचे ओझे असताना यंदाचा खरीप हंगामही संकटात सापडल्याने आर्थिक विवंचना वाढली होती. त्यातच दोन वर्षांपूर्वी झालेल्या विवाहानंतर त्यांचा घटस्फोट झाला होता. या दोन्ही कारणांमुळे ते गेल्या काही काळापासून मानसिक तणाव आणि नैराश्यात असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले.












