पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांची शिबिरांना भेट; प्रतापराव पाटील यांचे १६ जुलैच्या विशेष शिबिराला उपस्थित राहण्याचे आवाहन
जळगाव लाईव्ह न्यूज । मतदार यादी विशेष पुनरीक्षण (एसआयआर) अभियानाला पाळधी परिसरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, पाळधी खुर्द व पाळधी बुद्रुक येथे आयोजित विशेष शिबिरांमध्ये दिवसभर मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग नोंदवून आपली एसआयआर प्रक्रिया पूर्ण केली. राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असलेल्या या मोहिमेमुळे मतदार यादी अद्ययावत करण्याच्या कामाला वेग आला आहे.

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी पाळधी खुर्द येथील शासकीय विश्रामगृह तसेच पाळधी बुद्रुक येथील श्रीराम मंदिर परिसरातील शिबिरांना भेट देऊन कामकाजाची पाहणी केली. यावेळी त्यांनी नागरिकांशी संवाद साधत प्रत्येक पात्र मतदाराने एसआयआर प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले. लोकशाही बळकट करण्यासाठी अचूक आणि अद्ययावत मतदार यादी महत्त्वाची असून, कोणताही पात्र मतदार या प्रक्रियेपासून वंचित राहू नये, असे आवाहन त्यांनी केले.

या अभियानात युवा नेते प्रतापराव पाटील दिवसभर शिबिरस्थळी उपस्थित राहून संपूर्ण कामकाजावर बारकाईने लक्ष ठेवत होते. नागरिकांना आवश्यक कागदपत्रांबाबत मार्गदर्शन, अर्ज भरण्यास मदत, कागदपत्रांची पडताळणी तसेच उद्भवणाऱ्या अडचणींचे तत्काळ निराकरण करण्यासाठी त्यांनी बीएलओ (Booth Level Officer) आणि बीएलए (Booth Level Agent) यांच्याशी सातत्याने समन्वय साधला.
शिवसेना, युवासेना आणि जीपीएस मित्र परिवार यांच्या माध्यमातून या विशेष शिबिरांचे नियोजन करण्यात आले होते. पाळधी बुद्रुक येथील श्रीराम मंदिर आणि पाळधी खुर्द येथील शासकीय विश्रामगृह येथे सकाळपासून सायंकाळपर्यंत नागरिकांची मोठी गर्दी होती. कार्यकर्त्यांनी अर्ज भरण्यापासून ते आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यापर्यंत प्रत्येक टप्प्यावर नागरिकांना मदत केली. ज्येष्ठ नागरिक, महिला आणि दिव्यांगांसाठी स्वतंत्रपणे सहकार्याची व्यवस्था करण्यात आल्याने अनेक नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
या मोहिमेत आतापर्यंत पाळधी परिसरातील सुमारे ४० ते ५० टक्के एसआयआर प्रक्रिया पूर्ण झाली असून, २५ जुलैपर्यंत शंभर टक्के प्रक्रिया पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. त्यासाठी शिवसेना, युवासेना आणि जीपीएस मित्र परिवाराचे कार्यकर्ते पुढील काही दिवस घराघरांत जाऊन जनजागृती करणार आहेत. एकही पात्र मतदार या प्रक्रियेपासून वंचित राहू नये, यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे.
यावेळी प्रतापराव पाटील म्हणाले, “एसआयआर प्रक्रिया ही प्रत्येक मतदारासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. आज आपण या प्रक्रियेला प्राधान्य दिले नाही, तर भविष्यात मतदानाचा घटनात्मक हक्क गमावण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने आवश्यक कागदपत्रांसह ही प्रक्रिया वेळेत पूर्ण करून आपला मतदानाचा हक्क सुरक्षित ठेवावा.”
ते पुढे म्हणाले, “पाळधी परिसरात आतापर्यंत ४० ते ५० टक्के प्रक्रिया पूर्ण झाली असून, २५ जुलैपूर्वी शंभर टक्के एसआयआर पूर्ण करण्यासाठी कार्यकर्ते घराघरांत जाऊन जनजागृती करत आहेत. प्रत्येक पात्र मतदारापर्यंत पोहोचण्याचा आमचा निर्धार आहे.”
ज्या नागरिकांची एसआयआर प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही, त्यांच्यासाठी गुरुवार, दि. १६ जुलै रोजी पुन्हा विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा, आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहून आपली एसआयआर प्रक्रिया पूर्ण करावी आणि आपला मतदानाचा घटनात्मक हक्क सुरक्षित ठेवावा, असे आवाहन प्रतापराव पाटील यांनी केले.
प्रसंगी धरणगावचे तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी, धरणगाव तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी डॉ. भावना भोसले, नायब तहसीलदार प्रथमेश मोहोळ, पाळधी बुद्रुकचे माजी सरपंच संजूभैया देशमुख, उद्योजक अनिलभैया कासट, उपसरपंच निसार देशमुख यांच्यासह शिवसेना, युवासेना, जीपीएस मित्र परिवाराचे पदाधिकारी, बीएलओ, बीएलए आणि परिसरातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
नागरिकांचा वाढता प्रतिसाद, कार्यकर्त्यांचे सुयोग्य नियोजन आणि प्रशासनाशी प्रभावी समन्वय यामुळे पाळधी परिसरातील एसआयआर अभियानाला गती मिळाली असून, प्रत्येक पात्र मतदाराचा मतदानाचा हक्क अबाधित राखण्याच्या दिशेने ही मोहीम महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे चित्र दिसून येत आहे.










