जळगाव लाईव्ह न्यूज | केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नांदेड–मुंबई आणि टनकपूर–नांदेड या दोन नव्या एक्स्प्रेस गाड्यांचा शुभारंभ केला. मात्र, नांदेड–लोकमान्य टिळक टर्मिनस (मुंबई) द्विसाप्ताहिक एक्स्प्रेसला भुसावळ आणि चाळीसगाव येथे थांबा देण्यात आला असताना जळगाव जंक्शनला थांबा न दिल्याने जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.

पहिली हजूर साहिब नांदेड ते लोकमान्य टिळक टर्मिनस (मुंबई) एक्सप्रेस (गाडी क्र. 17665/17668) ही गाडी नांदेडहून सुटून पूर्णा, वसमत, हिंगोली, वाशीम, अकोला, मलकापूर, भुसावळ आणि मनमाड मार्गे मुंबईला जोडेल. या नवीन स्वतंत्र रेल्वे मार्गामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील प्रवाशांना मुंबईसाठी थेट कनेक्टिव्हिटी उपलब्ध झाली आहे.

गाड्यांचे सविस्तर वेळापत्रक
हजूर साहिब नांदेड ते लोकमान्य टिळक टर्मिनस (मुंबई) एक्सप्रेस (गाडी क्र. 17665) ही गाडी दर सोमवारी रात्री 21:15 वाजता नांदेडवरून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 13:40 वाजता मुंबईला (LTT) पोहोचेल. परतीच्या प्रवासात मुंबई LTT ते नांदेड एक्सप्रेस (गाडी क्र. 17668) मुंबईवरून दर मंगळवारी दुपारी 16:55 वाजता निघून दुसऱ्या दिवशी सकाळी 09:10 वाजता नांदेडला पोहोचेल.











