डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात गंभीर हृदयविकारावर यशस्वी उपचार

जुलै 2, 2026 6:15 PM

जळगाव लाईव्ह न्यूज ।हृदयावरील बायपास शस्त्रक्रियेनंतर उद्भवलेल्या गंभीर हृदयविकाराच्या समस्येवर डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील हृदयतज्ज्ञांनी अत्याधुनिक उपचार करून एका रुग्णाला नवजीवन दिले आहे. हृदयातील विद्युत प्रवाह खंडित होण्याच्या दुर्मिळ आणि गंभीर आजाराचे अचूक निदान करून ड्युअल चेंबर पेसमेकरची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. विशेष म्हणजे ही संपूर्ण शस्त्रक्रिया आयुष्मान भारत योजनेअंतर्गत रुग्णाला पूर्णपणे मोफत करण्यात आली. याबाबत माहिती अशी की, बोदवड तालुक्यातील संजय पाटील (वय ५९) नामक रूग्ण हे रीक्षा चालवून आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह भागवितात. संजय पाटील या रुग्णाची सुमारे दोन महिन्यांपूर्वी हृदयाची बायपास शस्त्रक्रिया झाली होती. शस्त्रक्रियेनंतर काही दिवस प्रकृती स्थिर होती. मात्र, त्यानंतर रुग्णाला वारंवार चक्कर येणे, डोळ्यासमोर अंधारी येणे, अचानक अशक्तपणा जाणवणे तसेच हृदयाचे ठोके अत्यंत कमी होण्याचा त्रास सुरू झाला. या लक्षणांमुळे रुग्ण व त्याच्या कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.प्रकृती बिघडल्याने रुग्णाला पुढील उपचारांसाठी डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले.

ddr

हृदयविकार तज्ज्ञांकडून अचूक निदान

हृदयालयाचे प्रमुख डॉ. वैभव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हृदयविकार तज्ज्ञ डॉ. अदनान अली, डॉ. सिद्धेश्वर खांडे आणि त्यांच्या अनुभवी टीमने रुग्णाची सखोल तपासणी केली. विविध चाचण्यांसह ईसीजी तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान रुग्णाला ‘एव्ही ब्लॉक’ हा गंभीर हृदयविकार असल्याचे निदान झाले. रुग्णाची स्थिती लक्षात घेऊन तज्ज्ञ डॉटरांनी ड्युअल चेंबर पेसमेकर बसविण्याचा निर्णय घेतला. ही शस्त्रक्रिया अत्यंत काळजीपूर्वक आणि यशस्वीरीत्या पार पाडण्यात आली. पेसमेकर बसवल्यानंतर रुग्णाच्या हृदयाचे ठोके नियमित झाले असून चक्कर येणे, अंधारी येणे यासारखी लक्षणे पूर्णपणे कमी झाली आहेत. सध्या रुग्णाची प्रकृती स्थिर असून त्याला नवसंजीवनी मिळाल्याची भावना कुटुंबीयांनी व्यक्त केली.आयुष्मान भारत योजनेमुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांनाही उच्च दर्जाचे उपचार मोफत उपलब्ध होत असून ही बाब आरोग्यसेवेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे.

एव्ही ब्लॉक म्हणजे काय?

एव्ही ब्लॉक ही अशी अवस्था असते की ज्यामध्ये हृदयाच्या वरच्या आणि खालच्या कप्प्यांमधील विद्युत संदेशांचा प्रवाह खंडित होतो किंवा अत्यंत मंदावतो. त्यामुळे हृदयाचे ठोके अनियमित व कमी होतात. योग्य वेळी उपचार न झाल्यास रुग्णाला बेशुद्ध पडणे, हृदयक्रिया बंद पडणे किंवा जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.

बायपास शस्त्रक्रियेनंतर काही रुग्णांमध्ये हृदयाच्या विद्युत वहन व्यवस्थेशी संबंधित गुंतागुंत निर्माण होऊ शकते. अशा वेळी चक्कर येणे, हृदयाचे ठोके कमी होणे, थकवा किंवा बेशुद्ध पडण्याची लक्षणे दिसल्यास त्वरित हृदयतज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. वेळेत निदान आणि योग्य उपचार झाल्यास गंभीर धोके टाळता येतात.
-डॉ. वैभव पाटील, विभागप्रमुख, हृदयालय.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now