जळगाव लाईव्ह न्यूज । १० एप्रिल २०२६ । गेल्या काही दिवसांपूर्वी जळगाव जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपून काढल्यानंतर, आता निसर्गाचे दुसरे टोक पाहायला मिळणार आहे. पावसाच्या सरींनी गारवा अनुभवणाऱ्या जळगावकरांना आता ‘हिट वेव्ह’ (Heat Wave) अर्थात उष्णतेच्या तीव्र लाटेचा सामना करावा लागणार आहे. हवामान खात्यानं आजपासून सहा दिवस जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचे संकेत दिले आहे.

गेल्या आठवड्यात अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात तापमान ३५ अंशावर आले होते. ऐन उन्हाळ्याच्या दिवसात झालेल्या या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. यामुळे जळगावकरांना उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळाला होता. मात्र, अवकाळीचे संकट दूर झाल्यानंतर आता जिल्ह्यात उन्हाचा चटका वाढू लागला आहे.

गेल्या २४ तासात जळगावचे कमाल तापमान ३६.६ अंश इतके होते. तर किमान तापमान २० अंश इतके होते. दिवसा उन्हाचे चटके तीव्र होत असताना, रात्री मात्र वातावरणात काहीसा गारवा जाणवत आहे. दरम्यान जिल्ह्यात आजपासून उष्णतेचा तडाखा वाढणार आहे.विशेष रात्रीच्याही उकाड्यात वाढ होण्याची शक्यता आहे.
हवामान खात्याच्या अंदाजनुसार, आज १० एप्रिल ते १६ दरम्यान जळगावचा पारा ४० ते ४३ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी उष्णतेपासून बचाव करण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, राजस्थानातील थार वाळवंटाकडून येणारे गरम आणि कोरडे वारे (लू) उत्तर महाराष्ट्रात वेगाने प्रवेश करत असल्याने तापमानात झपाट्याने वाढ होत आहे. या उष्ण वाऱ्यांचा परिणाम जळगाव जिल्ह्यासह परिसरावर जाणवू लागला असून दुपारच्या वेळेत उकाडा अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.








