जळगाव लाईव्ह न्यूज । १५ ऑक्टोबर २०२५ । राजस्थानमधील जैसलमेरमध्ये खासगी बसला भीषण आग लागल्याची घटना समोर आली असून या आगीत 20 जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर 16 जण गंभीर भाजले गेलेत. ही आग लागली कशी? याचा तपास केला जातोय.

दरम्यान जळालेल्या 20 जणांची ओळख पटविण्यासाठी डीएनए सॅम्पलिंग सुरू झाले आहे. त्यांच्या प्रियजनांचा शोध घेणाऱ्या कुटुंबातील दोन सदस्यांचे नमुने घेतले जात आहेत. जोधपूरमधील महात्मा गांधी रुग्णालय आणि जैसलमेरमधील जवाहर रुग्णालयात डीएनए सॅम्पलिंगची व्यवस्था करण्यात आली आहे. यापूर्वी मंगळवारी रात्री उशिरा जैसलमेरहून 19 मृतदेह जोधपूरला आणण्यात आले.

एकूण ५७ प्रवासी या बसमधून प्रवास करत होते. १४ ऑक्टोबर रोजी दुपारी ही खाजगी एसी बस जैसलमेरहून जोधपूरला जात असताना तिला आग लागली. यात काहीजण दिवाळीसाठी घरी जात होते. तर काही नातेवाईकांना भेटण्यासाठी निघाले होते. कुणाची पत्नी गेली, तर कुणाच्या डोक्यावर छत नाहीसे झाले. २० जणांच्या मृत्यूला नेमकं जबाबदार कोण? असा सवाल मृताच्या नातेवाईकांकडून विचारला जातोय. आग इतकी भयानक होती की मृतदेहाची ओळख पटवणेही कठीण आहे. डीएनए चाचणीच्या आधारावर मृतदेहाची ओळख पटवण्यात येणार आहे.
फक्त ५ दिवस जुनी असणारी बस आगीच्या गोळ्यासारखी झाली अन् क्षणात होत्याचे नव्हते झाले. ही आग लागली कशी? याचा तपास केला जातोय. प्राथमिक माहितीनुसार, एसीमध्ये शॉर्ट सर्किट मुळे आग लागली. त्यात काही प्रवाशांकडे दिवाळीचे फटाके होते. त्यामुळे आगीने क्षणात अक्राळ विक्राळ रूप घेतले. एसी बसमधून फटाके नेण्याची परवानगी नाही, तरीही घेऊन कसे जात होते, याचाही तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. राजस्थानचे मंत्री गजेंद्र सिंह खिमसर म्हणाले, “मी माझ्या आयुष्यात असा अपघात कधीच पाहिला नाही. बसमध्ये स्फोट झाल्याचे समोर आलेय. याबाबत FSL टीम चौकशी करेल.”










