जळगाव लाईव्ह न्यूज । ७ मार्च २०२५ । जळगावात मार्चच्या सुरुवातीला तापमानाचा पारा ३६ अंशापर्यंत गेला होता. यामुळे दिवसा उन्हाचा चटका चांगलाच वाढला होता. रात्रीचे तापमान देखील १७ अंशावर गेल्याने उकाडा जाणवत होता. मात्र गेल्या दोन दिवसात रात्रीच्या तापमानात मोठी घट झाली. जळगावात दोन दिवसात किमान तापमान ७ अंशानी घसरले.

जम्मू काश्मीर भागात पश्चिमी विक्षोभामुळे बर्फवृष्टी होत आहे. परिणामी उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरींमुळे जळगावसह जिल्ह्याच्या वातावरणात बदल झाला आहे. मंगळवारी रात्री १७ अंशांवर असलेले किमान तापमान गुरुवारी १० अंशांपर्यंत घसरल्याने गारव्यासोबतच थंडीही जाणवली. वाऱ्यांच्या बदलत्या दिशांमुळे तसेच उष्ण वाऱ्यांची गती कमी झाल्यामुळे रात्रीच्या वातावरणातील गारवा टिकून आहे.
गुरुवारी जळगावचे कमाल तापमान ३३ अंश तर किमान तापमान १० अंशापर्यंत होते. दिवसाच्याही तापमानात काहीशी घसरण झाल्याने दिवसा उन्हाच्या झळा काही अंशी तरी कमी झाल्या आहेत. मात्र होळीनंतर वातावरणातील उष्णतेचे प्रमाण वाढणार आहे.दरम्यान ८ मार्चपर्यंत पहाटेचा गारवा अधिक राहणार आहे. असा अंदाज वर्तवण्यात आल्याने सकाळी थंडी तर दिवसाच्या वेळी तापमान ३५ ते ३७ अंशांच्या दरम्यान राहणार असल्याने उकाडाही जाणवू शकतो. शहरासह जिल्ह्यात विषम वातावरण आहे.