जळगाव लाईव्ह न्यूज । भुसावळ तालुक्यातील सावखेडा येथे सुकी नदीपात्रातील खोल पाण्याच्या खड्ड्यात पडून सात वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अविनाश राजू जवरे (वय ७) असे मयत मुलाचे नाव असून या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. दरम्यान, नदीपात्रातील वाळू उपशामुळे निर्माण झालेल्या धोकादायक खड्ड्यांबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

अविनाश जवरे हा जिल्हा परिषद शाळेत इयत्ता दुसरीत शिक्षण घेत होता. सायंकाळच्या वेळी नदीपात्राजवळ खेळत असताना त्याचा पाय घसरला आणि तो खोल खड्ड्यात पडला. ही घटना लक्षात येताच ग्रामस्थांनी तातडीने धाव घेत त्याला बाहेर काढले.

गंभीर अवस्थेत अविनाशला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे जवरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, गावात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. अविनाशच्या पश्चात आई-वडील, भाऊ तसेच आजी-आजोबा असा परिवार आहे.
दरम्यान, सुकी नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर झालेल्या वाळू उपशामुळे अनेक ठिकाणी खोल खड्डे तयार झाले आहेत. हे खड्डे नागरिकांसाठी, विशेषतः लहान मुलांसाठी जीवघेणे ठरत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. अशा धोकादायक ठिकाणी तातडीने सुरक्षा उपाययोजना कराव्यात, खड्डे बुजवावेत आणि भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलावीत, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.










